"हे काय कोंबडीच्या पिसांसारखं", नव्या हेअरस्टाईलमुळे प्राजक्ता गायकवाड ट्रोल, भाऊ बाजू घेत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:26 IST2026-03-04T13:20:36+5:302026-03-04T13:26:47+5:30
प्राजक्तावर होत असलेल्या ट्रोलिंगला तिचा भाऊ ओम यादवनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

"हे काय कोंबडीच्या पिसांसारखं", नव्या हेअरस्टाईलमुळे प्राजक्ता गायकवाड ट्रोल, भाऊ बाजू घेत म्हणाला...
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. लग्नानंतर पुन्हा एकदा कामात व्यग्र झालेल्या प्राजक्ताने अलीकडेच एक नवीन 'हेअरस्टाईल' केली आहे. मात्र, तिचा हा हेअर लूक अनेक चाहत्यांना आवडलेला नाही. सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल केले गेले. यातच आता प्राजक्तावर होत असलेल्या ट्रोलिंगला तिचा भाऊ ओम यादवनं सडेतोड उत्तर दिलं आहे.
प्राजक्ताने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते, ज्यामध्ये तिचे केस खूप लहान दिसत आहेत. हे पाहून नेटकऱ्यांनी, "केसांची वाट लावली", "हा लूक अजिबात शोभत नाही" आणि "असं विचित्र काय केलंय?" अशा कमेंट्सचा पाऊस पाडला. या ट्रोलिंगवर प्राजक्ताचा भाऊ ओम यादवने सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली.
ओम यादवने लिहलं, "नमस्कार मी ओम यादव, प्राजक्ता ताईचा भाऊ…प्राजक्ता ताईच्या हेअर स्टाइलविषयी… ही हेअर स्टाइल शोभत नाही… चला हे तुमचे म्हणणे मान्य करू पण, तिच्या एका चित्रपटाचे शूटिंग चालू असल्याने दिग्दर्शकाच्या विनंतीनुसार कथेच्या मागणीनुसार तशी हेअरस्टाइल केलेली आहे याची नोंद घ्यावी. ताईने हे स्वइच्छेने केलेले नाही. 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका केल्यामुळे आपल्या सर्वांच्या मनात येसूबाई यांची एक आदराची भावना व प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळे हेअरस्टाइल बदलली गेल्याने आपण सर्वच गडबडलो. आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया व भावनेचा आदर करतो पण आपण ताईच्या करिअरचा सुद्धा आदर करुयात की… तिलाही वैयक्तिक आयुष्य आहे. थोडा संयम ठेवूयात".
ओमने पुढे म्हटले की, "ताईचे त्या चित्रपटाचे शूटिंग संपले आहे त्यामुळे आता केस वाढवून परत पहिल्यासारखे १-२ महिन्यात होतीलच की.. त्यात एवढे ट्रोल करण्यासारखे काय आहे? राहिला विषय ट्रोलिंगचा तर ताई एक पण कमेंट वाचत नाही. ट्रोलिंग सहन करने ही काय नवीन गोष्ट नाही. शेवटी आम्ही अशा कलाक्षेत्रात आहोत की लोक आपले चांगले वाईट मत व्यक्त करत राहणार… आपल्या सर्वांचा आदर आहे. तिचाही करा एवढेच", असेही त्याने स्पष्ट केले.
