"आईपण, करुणा आणि निस्वार्थी सेवा", नवरात्रीत अभिज्ञा भावेने शेअर केली तिची खरी जीवनमूल्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:29 IST2025-10-01T17:29:06+5:302025-10-01T17:29:56+5:30
Abhidnya Bhave :अभिज्ञा भावे सध्या 'तारिणी' मालिकेत काम करताना दिसते आहे. यात तिने कौशिकीची भूमिका साकारली आहे. कौशिकी हे पात्र जितकं नीतीमूल्यांवर चालणारं आहे, तितकीच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील वास्तव जीवनात खरीखुरी, प्रामाणिक, मातृत्व भावना आणि संवेदनशील स्वभावाची आहे.

"आईपण, करुणा आणि निस्वार्थी सेवा", नवरात्रीत अभिज्ञा भावेने शेअर केली तिची खरी जीवनमूल्य
अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील 'तारिणी' (Tarini Serial) मालिकेत काम करताना दिसते आहे. यात तिने कौशिकीची भूमिका साकारली आहे. कौशिकी हे पात्र जितकं नीतीमूल्यांवर चालणारं आहे, तितकीच अभिनेत्री अभिज्ञा भावे देखील वास्तव जीवनात खरीखुरी, प्रामाणिक, मातृत्व भावना आणि संवेदनशील स्वभावाची आहे. नवरात्री निमित्ताने अभिनेत्रीने तिची खरी जीवनमूल्यं शेअर केली आहेत.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अभिज्ञाने तिच्या जीवनमूल्यांबद्दल सांगितले. ती म्हणाली की, "मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते. आईपण, करुणा आणि निस्वार्थीपणा ही तिची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत आणि ती माझ्यातदेखील मी अनुभवते. हे गुण माझ्यात आधीपासूनच होते, पण जेव्हा मी गरजू लोकांशी संवाद साधू लागले, तेव्हा मला जाणवलं की त्यांना मदत करताना, कुठलाही स्वार्थ न ठेवता मी त्यांच्या पाठीशी उभी राहते. हीच खरी निस्वार्थी सेवा आहे. मानवांप्रमाणेच प्राण्यांविषयीही तितकीच संवेदनशील आहे. मी कधीही मांसाहार केला नाही आणि माझ्यातली आईपणाची भावना प्राण्यांप्रती देखील आहे, बालपणात मी म्हण ऐकली होती ‘अज्ञानात सुख असतं’, पण जस मला कळू लागलं तेव्हा समजलं की मी कधी ही, कोणाचं दु:ख पाहून दुर्लक्ष करूच शकत नाही."
"पण चुकीचं पाऊल उचलणार नाही..."
ती पुढे म्हणाली की, "मी नेहमी जागृत आणि सजग राहून जगते. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात, जेव्हा अनेक जण सोयीचा मार्ग निवडतात, तिथे मी कधीही सोपं वाटणारं, पण चुकीचं पाऊल उचलणार नाही. जरी योग्य मार्ग कठीण असला, तरी मी तोच मार्ग निवडते. मी माझ्या जीवनशैलीत देखील अनेक बदल केले आहेत जसं की, गाडीमध्ये प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटल्या ठेवणं, शक्य तिथे प्लास्टिकचा वापर टाळणं, अधिकाधिक झाडं लावणं, आणि पर्यावरणाचं भान ठेवणं. माझ्या अंत्यक्षणी मला स्वतःकडे पाहून अभिमानाने म्हणता येईल की, मी योग्य निर्णय घेतले, जरी ते कठीण होते, तरी मी माझ्या मूल्यांशी कधीच प्रतारणा केली नाही."