सेटवर पहिली भेट, लिव्हइन अन् लग्नाचा निर्णय, 'असं' पार पडलं होतं सोनाली खरेचं लग्न, लव्हस्टोरी आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 12:42 IST2026-03-31T12:38:17+5:302026-03-31T12:42:46+5:30
शूटिंगदरम्यान पहिली भेट, मैत्री अन् लिव्हइनमध्ये राहिले! सोनाली खरेने सांगितली प्रेमाची गोष्ट, का केलेलं कोर्ट मॅरेज?

सेटवर पहिली भेट, लिव्हइन अन् लग्नाचा निर्णय, 'असं' पार पडलं होतं सोनाली खरेचं लग्न, लव्हस्टोरी आहे खास
Sonali Khare: अभिनेत्री सोनाली खरे हे नाव मराठी प्रेक्षकांसाठी काही नवं नाही. सोनालीने आजवर अनेक लोकप्रिय मालिका, चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. 'सावरखेड एक गाव','चेकमेट','हृदयांतर' अशा गाजलेल्या कलाकृतींमधून अभिनय करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनय क्षेत्रात यश मिळवल्यानंतर सोनालीने अभिनेते बिजय आनंद यांच्यासोबत लग्न केलं. एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान सोनाली आणि बिजय आनंद यांची भेट झाली होती. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या जोडप्याने त्यांची हटके लव्हस्टोरी शेअर केली आहे.
अलिकडेच सोनाली खरे आणि तिचे पती बिजय आनंद यांनी 'द अनुरुप शो' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, सोनाली खरे म्हणाली, "सुरुवातीला आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. जेव्हा एका प्रोजेक्टसाठी शूट सुरु झालं तेव्हा ४ ते ५ दिवसांचं शूट पावसामुळे आणखी पुढे ढकळण्यात आलं. त्यामध्ये आमच्यात हळूहळू मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मग शूट संपल्यानंतर देखील आम्ही भेटायचो. तेव्हा असं जाणवलं की आमच्या मनात एकमेकांबद्दल काहीतरी आहे. पण, तेव्हा देखील आपण लग्न करूयात असा काही विचार नव्हता. मग अडीच वर्षानंतर आम्ही लग्न केलं. त्याच्याआधी आम्ही लिव्हइनमध्ये राहत होतो. माझं तेव्हा खूप शूटिंग चालू असायचं. त्यामुळे मग आमचं भेटणं कमी होऊ लागलं. मग शूटिंग संपवून पुन्हा डोंबिवलीला जाणं मला खरंच जमायचं नाही. मी माझ्या कामात बिझी…बिजय त्याच्या कामात बिझी, मग पॅकअप झाल्यावर मी डोंबिवलीला जाणार या दरम्यान आम्हाला भेटायला मिळायचं नाही.त्यामुळे आम्ही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला."
मग सोनाली म्हणाली,"माझ्या आईला या सगळ्याबद्दल माहिती होतं. मी तिला कल्पना देऊन ठेवली होती.अडीच वर्षांनी मग आईने सांगितलं…आता लग्न तरी करा किंवा मग इथेच पूर्णविराम द्या.मग त्यानंतर आम्ही लग्नाबद्दल विचार केला. मग बिजय आनंद त्यांच्या नात्याबद्दल म्हणाले, तेव्हा आमच्यात चांगली मैत्री होती. कारण, कोणत्याही नात्यात मैत्री खूप महत्त्वाची असते. जेव्हा आमच्या नात्याला अडीच-तीन वर्षे झाली तेव्हा असं जाणवलं, अरे ही माझ्याबरोबर नसेल तर माझं कसं होणार? आम्हाला एकत्र विविध पदार्थ बनवून खायला आवडतात, फिरायला खूप आवडतं. मग, तेव्हा विचार आला या सुंदर मैत्रीचं रुपांतर नात्यात झालं तर आम्ही दोघेही आनंदात राहू."
यावेळी मुलाखतीत प्रपोजलबद्दल विचारल्यावर बिजय आनंद यांनी सांगितलं," मी पहिल्यांदा प्रपोज केलं. आम्ही केनियाला गेलो होतो. तेव्हा ही नाश्ता करत होती. मी तिला बोललो, जास्त खुश नको होऊस पण, आता मी तुला जे काही विचारतोय त्याचा नीट विचार कर. जर, मला तुला तुझ्याशी लग्न करायचं असेल तर, तुझं काय म्हणणं असेल? अगदी प्रॅक्टिकल प्रपोजल होतं. कारण, मला फिरायला भयंकर आवडतं हे तिला माहितीये. म्हणून मी तिला तेव्हाच विचारलं होतं, मी ६०-७० वर्षांचा झाल्यावर जर मला वाटलं आता मी हिमालयात निघून जाणार, तर तुला चालणार आहे का?"
"त्याने मला लग्न कर असं सांगितलं नाही. त्याने मला त्याने मला प्रॅक्टिकली बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि मग लग्नाबद्दल माझं मत जाणून घेतलं. मी सुद्धा लगेच होकार दिला नव्हता. त्यानंतर मी यावर विचार केला. मग आम्ही मुंबईला आलो त्यानंतर मी लग्नासाठी होकार कळवला." असं पुढे सोनाली खरेनं सांगितलं.
या कारणामुळे केलं कोर्ट मॅरेज लग्न…
कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न करण्याच्या निर्णयावर बिजय आनंद म्हणाले,"मला लग्नात शोऑफ आवडत नाही. दीड हजार लोकांना बोलवून फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न करायचं हे मला पटत नाही. मला तसं नव्हतं करायचं. कोर्ट मॅरेज करून एक छोटीशी पार्टी दिली. जे लोक असं लग्न करतात त्यांच्याबद्दल मला आदर आहे. म्हणजे अगदी साध्या पद्धतीने आम्ही लग्न केलं. यावर सोनीली म्हणाली, जे लोक अगदीच जवळचे होते त्यांना बोलवून आम्ही लग्न केलं होतं. घरी काही लोक आले होते त्यांच्या साक्षीने आम्ही कोर्ट मॅरेज केलं.मग त्यानंतर रिसेप्शन ठेवलं. असा खूप मोठा सोहळा आम्ही केला नव्हता. माझ्या आईची इच्छा होती की, काहीतरी असं मंत्रोक्चार वगैरे व्हावे. मग आम्ही पूजा वगैरे आम्ही घातली. आम्ही सगळ्यांचा आदर करतो. पण, तरीही त्या लग्नामध्ये आपण सगळ्यांना खुश करतो, असं कधीच होत नाही. मग निदान आपल्या आनंदाचा विचार तरी करूया. त्याप्रमाणे आम्ही लग्न केलं आणि माझ्या आईला देखील ते मान्य झालं. "