वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा
By देवेंद्र जाधव | Updated: June 8, 2025 17:03 IST2025-06-08T17:03:03+5:302025-06-08T17:03:35+5:30
आई कुठे काय करते फेम लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या कुटुंबाविषयी भावुक खुलासा केलाय. गेली ३-४ वर्ष तिचं कुटुंब तिच्याशी का बोलत नाही? हे तिने सांगितलं आहे

वडिलांच्या निधनानंतर घेतलेल्या 'त्या' निर्णयामुळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं, मराठी अभिनेत्रीचा भावुक खुलासा
'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्री सीमा घोगळे यांनी त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर अंतिम संस्कार स्वतः करायचा निर्णय घेतला होता. पण त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या नाराजीला त्यांना सामोरं जावं लागलं, याचा खुलासा केला. सीमा म्हणाल्या, "माझ्या समोर पाच मिनिटात माझे बाबा गेले. जे कोणी माझ्या आणि बाबांच्या ओळखीचे पेपरवाले होते त्यांना मी प्रेस नोट दिली."
"५ वाजून ५ मिनिटांनी बाबा गेले. नातेवाईक यायला अजून दोन-अडीच तास होता. रात्रभर त्यांचं पार्थिव घरी ठेवलं आणि परत सकाळी अंतिमसंस्कार तर त्याचा त्रास माझ्या आईला-नातेवाईकांना होणार. तो गोंधळ मला नको होता. आम्ही बहिणीच होतो. त्यावेळी माझी मावशी-चुलत भावंडं मी कोणालाच विचारलं नाही. तो निर्णय मी घेतला होता. मला पुढील तीन तासात त्यांचं सर्व करायचं होतं."
"कुटुंबीयांना फोन करुन सांगितलं की, तयारी करा. इथे कोणी येऊ नका. तरीही माझी मोठी बहीण आली. त्यावेळी माझी मोठी बहीण आणि मी हॉस्पिटलमधून बाबांना घरी घेऊन गेलो. घरी तोपर्यंत सगळे आले होते. मुलगा नाही तर अंतिम संस्कार कोण करणार? बोलणारे बोलत असतात की, आमची मुलगी करेल. पण आमच्याकडचं घोगळे कुटुंब आहे हे थोडं जुन्या विचारांचं आहे. त्यांना काही गोष्टी पटतातच, असं नाही. त्यामुळे भावंडांनी आपसात ठरवलं की, आपल्याला विद्युतदाहिनी आणि सगळं ते करायचं आहे."
"पण मी त्यांना बोलले असं नाही. माझं बोलणं झालंय ना बाबांशी, मी करणारेय म्हणून. त्यामुळे मी बाबांचं जे काय कार्य होतं ते केलं. पण हे केल्यानंतर मला कळालं की, माझं घोगळे कुटुंब माझ्यापासून दुरावलं. न विचारता घेतलेला माझा निर्णय त्यांना आवडला नाही. तीन तासात वडिलांचे अंत्यसंस्कार करायचा डिसिजन तिने घेतला, तिने अंत्यसंस्कार स्वतःच केले, हे त्यांना पटलं नाही. अंत्यसंस्कार केलेस आता कार्य पण तुझी तूच कर, असं मला म्हणाले. मी म्हटलं ठीक आहे."
"कार्य तारखेनुसार नाही तर तिथीनुसार होतात. दहावं-बारावं झालं, वर्षकार्य आलं. आपण मुली असल्याने आपल्याला पण काहीतरी अडचणी येतात, तेव्हा टेन्शन आलं. माझी आई माझ्यासोबत होती. पण कुठेतरी बाबांचं पूर्ण कार्य मी करुन द्यावं, हे असेल कुठेतरी. बाबांच्या वर्षकार्याच्या आदल्या दिवशी रात्री माझे पिरियड्स आले. आईला म्हटलं, उद्या कसं करु मी वर्षकार्य. गावापासून सगळी लोक येणार. शक्य नाही त्याला मी हात लावणं. आता? आई म्हणाली, गप्प बस. काही बोलू नको. जे त्याच्या मनात असेल ते होईल."
"सकाळी साडेपाचला गावावरुन फोन आला की गावातलं कोणीतरी वारल्याने सुतक लागलेलं आहे त्यामुळे वर्षकार्य एक आठवडा पुढे गेलं. मला असं झालं की, हे माझ्या हातूनच होणं होतं. पण या गोष्टी माझ्यातल्या कुटुंबातील लोकांना नाही कळाल्या." राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सीमा घोगळे यांनी ही करुण कहाणी सर्वांना सांगितली. आजही सीमा यांच्या बहिणी त्यांच्याशी बोलत नाहीत.