"लग्नानंतर सण साजरे होतात, पण मला आईच्या तेराव्याला जावं लागलं..." मराठी अभिनेत्रीची दु:खद पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:26 IST2026-02-12T13:25:11+5:302026-02-12T13:26:30+5:30
आईची शेवटची भेट चुकली याची खंत घेऊन मला पूर्ण आयुष्य जगावं लागणार आहे..., अभिनेत्रीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

"लग्नानंतर सण साजरे होतात, पण मला आईच्या तेराव्याला जावं लागलं..." मराठी अभिनेत्रीची दु:खद पोस्ट
मराठी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवेचं दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं. उदय कुंडप यांच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली. तिचा नवरा डॉक्टर आहे. लग्नानंतर आनंदात असलेल्या भाग्यश्रीवर दोनच महिन्यात दु:खाचा डोंगर कोसळला. भाग्यश्रीच्या आईचं निधन झालं. तिने काही दिवसांपूर्वीच पोस्ट करत तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. आता तिच्या आईला जाऊन १३ दिवस झाले. लग्नानंतर येणारे प्रत्येक सण साजरे करताना नवी नवरी ही शोस्टॉपर असते. पण माझ्यावर आईच्या तेराव्याला सवाष्ण म्हणून जायची वेळ आल्याचं सांगत तिने भावुक पोस्ट लिहिली आहे.
भाग्यश्री न्हाळवेने लिहिले, "महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या मुली वर्षभर नवी नवरी असतात... पहिल्या वर्षातले सगळे सण हे तिचे असतात...अख्खं वर्ष ती शो स्टॉपर असते. नव्याचे नऊ महिने...पण असं झालं नाही. माझ्या बाबतीत तसं काही घडणार त्या आधीच आई तुझ्या तेराव्याच असं सवाष्णी जेवण मला जेवावं लागलंय. प्रत्येक घासा गणिक तू माझ्या डोळ्यातल्या पाण्याबरोबर तरंगत होतीस. मनातल्या मनात मी तुला विचारत होते याच करता का मला तू सौभाग्यवती केलंस? मला कोणतेही सण वार नको होते ग..आई.. मला तू हवी होतीस. टिपिकल अरेंज मॅरेज मधे मला तू हवी होतीस. खूप काही बोलायला. खूप काही समजून घ्यायला..खूप काही समजून सांगायला. तू माझी थेरपिस्ट होतीस. तुझ्याशी सगळं बोलून मला हलकं वाटायचं. पण आता कोणाशी बोलावंस वाटत नाहीये. तुला घेऊन खूप ठिकाणी फिरायचं होत मला. घरात झोपाळा बसवायचा राहून गेला. तुला एक नातवंड द्यायचं होतं. तुझ्या अशा जाण्याने मला खूप एकटं वाटतंय आई."
"तुझ्या जाण्याने माझं सगळ आयुष्य वर खाली झालंय. फिरून फिरून तूच दिसतेस. तुझेच भास होतात मला. अंगावर कोणी डोंगर ठेवलाय असं वाटत राहतं. माझी आई गेली तेव्हा मी मलेशियात होते. माझ्या आणि तुझ्या शेवटच्या भेटीसाठी झालेली ताटातूट कधीच कोणाला समजणार नाही. तू जाता जाता पण तुझ्या या राणू ला स्ट्राँग निर्णय घ्यावा लागला की माझ्या आईला खूप गार लागतं. जिवंतपणी खूप यातना भोगल्यास. तेव्हा तुला तुझ्या शेवटच्या क्षणी मला तुला यातना नाही द्याव्याशा वाटल्या. आणि एका क्षणात सगळं मी निमूटपणे स्वीकारलं आणि कोणी माझा विचारही केला नाही. मला तुला शेवटचं भेटताही येणार नाही, हे ऐकल्यावर मी जमिनीवर कोसळून पडले. आईची शेवटची भेट चुकली याची खंत घेऊन मला पूर्ण आयुष्य जगावं लागणार आहे. या सत्य विचाराने मला अर्ध मेल्यासारखं वाटत आहे. आता माहीत नाही पुढे काय होईल."
भाग्यश्री न्हावलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्रीने मराठीसह हिंदी मालिकाविश्व देखील गाजवलं आहे. 'कुंकू टिकली आणि टॅटू', 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' तसंच 'माटी से बंधी डोर' या हिंदी मालिकेतही ती झळकली आहे. अजय देवगणच्या 'तान्हाजी' सिनेमात तिने सूर्याजी मालुसरेंच्या पत्नीची भूमिका साकारली होती.