"छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला...", वाढत्या गुन्हेगारीवर मिलिंद गवळींचा संताप, म्हणाले...
By सुजित शिर्के | Updated: March 24, 2025 13:11 IST2025-03-24T13:09:09+5:302025-03-24T13:11:27+5:30
मिलिंद गवळी (Milind Gawali) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.

"छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला...", वाढत्या गुन्हेगारीवर मिलिंद गवळींचा संताप, म्हणाले...
Milind Gawali: मिलिंद गवळी (Milind Gawali) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. गेली अनेक वर्षे मराठी सिनेविश्वात तसेच मालिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं. अभिनेते मिलिंग गवळी सोशल मीडियावरही कमालीचे सक्रिय असतात. त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर ते परखडपणे आपलं मत व्यक्त करताना दिसतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नुकतीच मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिलंय की, "आजकालची बरीचशी मुलं पालकांच्या हाताबाहेर गेलेली आहेत, अनेक पालक मुलांसमोर हतबल झालेले मी पाहतो आहे, जनरेशन-झेड किंवा जनरेशन-अल्फा जी काय ती, ही अतिशय हुशार पिढी आहे, ज्या गोष्टी आई-बाबांना कधी जमल्या नाहीत, ही पिढी सहज करते, घरांमध्ये कोणी कुठला मोबाईल घ्यायचा आपली मोठी गोष्ट घ्यायची या सगळ्या गोष्टी आईबाप ठरू शकत नाही, हे निर्णय घरामध्ये मुलंच घेत असतात. आई-बाबांनी यांना मित्रासारखा वाढवलेले आहे, त्यामुळे पूर्वीच्या पिढीतल्या मुलांना आई-बाबा विषयी जो धाक होता, तू धाक आता संपलेला आहे. आम्ही शाळेत असताना ३ प्रकारचे सिनेमे प्रदर्शित व्हायचे, ए, युए, आणि यु सेन्सॉर सर्टिफिकेट , ए सर्टिफिकेट असलेले चित्रपट मुलांना कधीच बघायला मिळायचे नाही, अशक्य गोष्ट होती ती, पण आज या इंटरनेटमुळे, ओटीटीमुळे, मेंदू परिपक्व न झालेल्या मुलांना एका बटणावर किल्क केल्यावर सगळा अडल्ट कंटेट बघायला मिळतो."
पुढे त्यांनी लिहिलंय, "त्याचे भीषण परिणाम आज आपल्याला अनुभवायला मिळतात, कुठलाही न्यूजपेपर उघडून बघा, कुठलंही न्यूज चॅनेलवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, खून, चार-पाच मुलांनी मिळून हे कृत्य केलेलं असतं, त्यात एखाद दोन मायनर मुलं असतात, या विषयावर स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांनी 'इन्व्हेस्टमेंट' नावाचा उत्कृष्ट चित्रपट केला होता , याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण दुर्दैवाने तो लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. हे गुन्हे करणाऱ्या लोकांना पोलिसांची कायद्याची भीती राहिलेली नाही. 1862 मध्ये 'lord Macaulay' ने केलेला कायदा IPC इतकी वर्ष लागू आहे, आता जुलै 2024 पासून बीएनएस भारतीय न्याय संहिता. या कायद्याची पुणे करांना भीती आहे? भर रस्त्यात महिला पोलीस अधिकारीच्या वर्दीवर हात टाकायची या देशांमध्ये हिम्मतच कशी होते."
छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत म्हणाले...
"छत्रपती शिवाजी महाराजांनी एका स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझे गावच्या पाटलाला (बाबाजी उर्फ भिकाजी गुजर) 'चौरंग' करण्याची शिक्षा दिली होती, म्हणजे त्याचे दोन्ही हात आणि पाय तोडण्याची शिक्षा. आणि त्या पाटलाला रोज उचलून चावडीवर बसवायचं, रोज येणाऱ्या जाणाऱ्याला कायद्याची दहशत निर्माण केली. काल मी सांस्कृतिक प्रबोधिनी पनवेल, पालक शिक्षक सांस्कृतिक सोहळ्याला गेलो होतो, या सुंदर कार्यक्रमांमध्ये मी दोन शब्द बोललो,पालकांनी आणि शिक्षकांनी आपल्या चिमुकल्या लेकरांसाठी त्यांच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षेसाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, आपली लेकरं सशक्त आणि सुरक्षित, भारताचे चांगले नागरिक होण्यासाठी."