शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 03:30 PM2023-09-13T15:30:11+5:302023-09-13T15:30:36+5:30

Jawan : किरण मानेंनी थिएटरमध्ये जाऊन ‘जवान’ पाहिला. किंग खानचा ‘जवान’ पाहिल्यानंतर माने भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

kiran mane shared special post after watching shah rukh khan jawaan movie | शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..."

शाहरुखचा 'जवान' पाहून किरण माने भारावले, म्हणाले, "लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना गुडघ्यावर आणून..."

googlenewsNext

शाहरुख खानच्या ‘जवान’ने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. किंग खानच्या या चित्रपटाचं अनेक सेलिब्रिटीही कौतुक करत आहेत. दमदार कथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय असलेल्या जवानने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘पठाण’नंतर शाहरुखच्या चाहत्यांना ‘जवान’बद्दल उत्सुकता होती. हा चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षेस खरा उतरल्याचं चित्र आहे. मराठमोळे अभिनेते किरण मानेंनीही शाहरुखचा जवान पाहिला.

किरण माने किंग खानचे चाहते आहेत. त्यांनी याआधीही शाहरुखबद्दल पोस्ट शेअर केली होती. किरण मानेंनी थिएटरमध्ये जाऊन ‘जवान’ पाहिला. किंग खानचा ‘जवान’ पाहिल्यानंतर माने भारावून गेले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत हेमा मालिनींचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “ते अमेरिकेला...”

किरण मानेंची पोस्ट

...हरीवंशराय बच्चन रोज रात्री झोपायच्या आधी व्हिसीआर वर बच्चनसायबांचा कुठलातरी एक पिच्चर बघून मग झोपायचे. खरंतर हरीवंशराय बच्चन हे अभिजात कवी. 'मधुशाला' सारख्या क्लासिकची भारतातील महान काव्यामध्ये गणना होते. अमिताभला वाटायचे, 'आपले पिच्चर तद्दन मसाला. 'लॉजिक बिजिक' गुंडाळून ठेवून पिटातल्या पब्लिकसाठी बनवलेले. आपल्या बुद्धीवादी बाबूजींना त्यात काय आवडत असेल?' त्यावर हरीवंशरायजींनी जे उत्तर दिलं, ते लै भारी होतं. ते म्हणाले, "बेटा, आपली बहुतांश जनता गोरगरीब आहे. महागाई, बेरोजगारीनं त्रासलेली आहे. कामावर मालकही शोषण करतो. त्यांना मनोमन वाटतं बंड करुन उठावं. तू तीन तासापुरता अशा भारतीयांचा 'मसीहा' बनतोस. त्यांना 'पोएटिक जस्टिस' मिळवून देतोस! ते या समाधानात थिएटरबाहेर पडतात की 'आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शेवटी सत्य, मानवता, प्रामाणिकपणा विजय होतो. दुष्टांचा खातमा होतो.'

...आजच्या भवतालात अशा 'मसीहा'ची गरजय. बच्चनही 'बच्चन' राहिला नाही. ती कमी शाहरूखनं भरुन काढली. सर्वसामान्य प्रेक्षकांना जातपात, धर्म वगैरेंशी काहीही घेणंदेणं नाय. त्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत पडलीय. तीस-चाळीस हजारांच्या कर्जाच्या ओझ्यानं दबून शेतकरी आत्महत्या करतात, तर दूसरीकडं बड्या उद्योगपतींचं चाळीस हजार कोटींचं कर्ज माफ होतं. सरकारी हॉस्पिटल्समध्ये सुविधांच्या अभावापोटी असंख्य चिमुरड्यांपास्नं वयोवृद्धांपर्यन्त किड्यामुंगीसारखे मरतायत. महागाई, बेरोजगारी वाढतच चाललीय. बॉर्डरवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या हातातही अतिशय निकृष्ट दर्जाच्या रायफली असतात. नवनवीन सरकारं आपण निवडून देतो, पन निवडणुकांमध्ये जी आश्वासनं दिली जातात, त्यांना नंतर हरताळ फासला जातो.

...अशा परिस्थितीत 'जवान'नं सगळ्या भारतीयांच्या मनोरंजनासोबतच, मनात खदखदत असणार्‍या गोष्टींना वाचा फोडली आहे... खर्‍या समस्या सोडवून 'न्याय' पण मिळवून दिला आहे. सिनेमात का होईना 'काला धन' परत मिळवून गोरगरीबांच्या खात्यात जमा करण्यापास्नं लोकप्रतिनिधी, मंत्र्यासंत्र्यांना गुडघ्यावर आणून अत्यावश्यक सेवांबद्दल जाब विचारण्यापर्यन्त सगळं-सग्ग्गळं केलं त्यानं.

पूर्वीच्या काळी अशा आशयाचे अनेक सिनेमे येऊन गेलेत. पण आज हे मांडणं लै लै लै धाडसाचं आणि गरजेचं आहे. त्याकाळात मुभा होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुल्यांची जपणूक होती. 'बायकॉट ट्रेंड' नव्हता. त्यामुळं आज 'खर्‍याखुर्‍या' समस्यांवर परखडपणे बोलून वास्तवाचं भान देणार्‍या मनोरंजक फॅंटसीची लै लै लै गरज होती. प्रेक्षकांनी अक्षरश: दिवाळी-दसरा असल्यागत ही गोष्ट साजरी केली.

मनोरंजन करण्याबरोबर समाजभान असणारे कलावंत आज दुर्मिळ झाले आहेत. व्यवस्थेपुढं लोटांगण घालणार्‍या पायचाटू, लाळघोट्या सुमार कलावंतांची सद्दी आहे. त्यांच्या मुस्काडीत मारून पाठीचा कणा ताठ ठेवत, डोळ्यांत अंगार घेवून, फूल्ल ऑफ स्वॅगनं शाहरूख आलाय...

लै दिसांनी थिएटरमध्ये हिरोच्या एन्ट्रीला टाळ्या, शिट्ट्यांचा छप्परतोड दनका अनुभवला. लै दिसांनी "बेटे को हाथ लगाने से पहले..." सारख्या डायलॉगला प्रेक्षकांनी जल्लोष केलेला पाहिला. लै दिसांनी आमचा खराखुरा 'हिरो' आम्हाला दिसला !

आनंदाचे डोही आनंद तरंग घेऊन थिएटरबाहेर पडलो. बाहेर पडतानाबी लोकांना घरी जायची घाई नव्हती. मन भरलं नव्हतं. जाता-जाता शाहरूखच्या पोस्टर समोर सेल्फी काढायला रांग लागली होती. मी बी त्यात सामील झालो... कारण आम्हा सर्वांना तीन तासात 'पोएटिक जस्टीस' मिळाला होता ! लब्यू ॲटली...आणि शारख्या, तुला घट्ट घट्ट मिठी !

 

‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”

दरम्यान, शाहरुखच्या ‘जवान’ने अवघ्या चार दिवसांतच जगभरात ५०० कोटींचा टप्पा गाठला. या चित्रपटाने आत्तापर्यंत देशात ३५० कोटींचा तर जगभरात ६०० कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक हे कलाकारही झळकले आहेत.

Web Title: kiran mane shared special post after watching shah rukh khan jawaan movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.