'आई तुळजाभवानी' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, बाल जगदंबेसमोर नव्या संकटाची चाहूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 19:58 IST2025-06-29T19:57:25+5:302025-06-29T19:58:26+5:30
Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी'मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे असुरीशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी माया आता उघडपणे आक्रमणाच्या तयारीत दिसते आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेत उत्कंठावर्धक वळण, बाल जगदंबेसमोर नव्या संकटाची चाहूल
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी(Aai Tulja Bhavani Serial)मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे असुरीशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी माया आता उघडपणे आक्रमणाच्या तयारीत दिसते आहे. येत्या रविवारी २९ जूनच्या विशेष भागात मायाचा पहिला घातक वार घडणार असून, हा क्षण प्रेक्षकांसाठी अंगावर काटा आणणारा ठरणार आहे.
मायाच्या हातातल्या पाच कवड्या तिच्या योजनांचं प्रतीक आहेत. यातील एक कवडी ती उचलते आणि जगदंबेला उद्देशून बोलते ''तयार रहा जगदंबा, माझा पहिला वार सहन करायला.'' या शब्दांमागे मायाच्या दुष्ट मनसुब्यांची सुरूवात स्पष्ट होते. साध्या स्त्रीच्या वेशात माया थेट जगदंबेच्या घरात प्रवेश करते. स्वयंपाकघरात भांड्यात शिजत असलेल्या अन्नात ती एक मायावी द्रव मिसळते, त्या द्रव्यामुळे सगळे जेव्हा दीर्घ निद्रेत जाणार तेंव्हा जगदंबाला माया तिच्यासोबत घेऊन जाण्याचे जाळ रचते. मायाच्या चेहऱ्यावर यावेळी दिसणारे असुरी हास्य तिच्या घातक नियोजनाचा प्रत्यय देते, विश्वासाचं रूप घेऊन माया मृत्यूचा घास देणार आहे.
माया जेवणाच्या वेळी स्वतःच्या हाताने जगदंबेला घास भरवते, तिच्या चेहऱ्यावर मायाळूपणा पण डोळ्यांत मात्र कपट. दुसऱ्या हातात कवडी कुस्करून ती तिच्या कावेबाज योजनेचा आरंभ करते. गंगाई आणि जनकबाबा बाजूला जेवत असताना सगळं काही सामान्य वाटतंय, पण त्या निरागस अन्नघासामागे आहे एक भयावह कट आहे. मायाचा वार जगदंबा कसा परतवणार? याचं उत्तर मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.