Bigg Boss Marathi 2 Grand Finale Updates: नेहा शितोळेसोबत या स्पर्धकाने मारली फायनलला बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 23:58 IST2019-09-01T22:35:35+5:302019-09-01T23:58:33+5:30
थोड्याच वेळात या कार्यक्रमाच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे. या दोघांपैकी एकाला बिग बॉस मराठीची ट्रॉफी मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 2 Grand Finale Updates: नेहा शितोळेसोबत या स्पर्धकाने मारली फायनलला बाजी
बिग बॉस मराठी 2 ची सध्या चांगलीच हवा आहे. या कार्यक्रमाचा फिनाले आज प्रेक्षकांना पाहायला मिळत असून आता विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आता दोन स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. शिव ठाकरे आणि नेहा शितोळे यांच्यामधील एकाला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 25 लाख मिळणार आहेत. थोड्याच वेळात या कार्यक्रमाच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे.
नेहा ही मुळची पुण्याची असून पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये तिचे शिक्षण झाले आहे. अगदी लहान वयापासूनच तिला अभिनयाविषयी आवड असल्याने ती कॉलेजमधील विविध कल्चरल कार्यक्रमात भाग घेत असे. त्यानंतर तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने अनेक वर्षं स्ट्रगल केल्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. देऊळ हा तिचा पहिला मराठी चित्रपट होता. नेहाने रेडीमिक्स, सुर सपाटा, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या प्रसिद्ध बेवसिरिजमध्ये ती काटेकरच्या पत्नीच्या भूमिकेत ती दिसली होती. नेहाला बिग बॉसमुळे तर सध्या चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले. नेहाचे लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव नचिकेत पूर्णपत्रे असून तो प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने कमीने, रॉकी हँडसम, मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर यांसारख्या हिंदी तसेच झिपऱ्या, अस्तू यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शिव ठाकरे एमटीव्ही रोडीजमध्ये झळकला होता. या कार्यक्रमाच्या सेमी फायनलपर्यंत त्याने मजल मारली होती. बिग बॉस मराठीमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. शिवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला असल्याचे त्याने या कार्यक्रमात अनेकवेळा सांगितले आहे. बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. ते या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.