'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवे वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 15:06 IST2023-03-03T15:05:45+5:302023-03-03T15:06:51+5:30
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवे वळण
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आता अरुंधतीच्या आयुष्यात नवे वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. मात्र यश आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार आहेत. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुख यांच्या घरातूनच होणार असे ठामपणे सांगितले. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे.
अरुंधतीने घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेवल्या. मात्र आशुतोषमुळे अरुंधतीच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले. गाण्याची आवड जपता जपता आशुतोषच्या रुपात तिला आयुष्याचा साथीदार मिळाला. अरुंधतीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरु होतोय असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अरुंधतीच्या मनात संमिश्र भावना नक्कीच आहेत. ज्या घराने इतके भरभरुन प्रेम दिले त्या घरातून पाठवणी होताना तिचेही डोळे पाणावलेत.
याबद्दल मधुराणी गोखले म्हणाली, समाजामध्ये अशा पद्धतीचे लग्न स्वीकारले जाते हा बदल स्वागतार्ह आहे असे मला वाटते. अरुंधतीला नटायची, दिखावा करायची आवड नाही. लग्न छोटेखानी करावे अशी तिची इच्छा होती. मात्र सुलेखा ताईंचा मान आणि सर्वांच्या आग्रहाखातर ती लग्नासाठी छान नटली आहे.