"घटस्फोटानंतर स्वतःला कोंडून घेतलं होतं" दुसऱ्या लग्नानंतर समांथाचं वक्तव्य, दुसरा नवरा राजबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 12:20 IST2026-02-24T11:33:41+5:302026-02-24T12:20:21+5:30
समांथाचा भावनिक खुलासा; दुसरा नवरा राजमुळे आयुष्य बदललं; म्हणाली...

"घटस्फोटानंतर स्वतःला कोंडून घेतलं होतं" दुसऱ्या लग्नानंतर समांथाचं वक्तव्य, दुसरा नवरा राजबद्दल म्हणाली...
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये विशेष छाप सोडणारी अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. समांथा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदी टप्प्याचा आनंद घेत आहे. गेल्यावर्षी १ डिसेंबर २०२५ रोजी ती प्रसिद्ध निर्माता राज निदिमोरू याच्याशी 'भूत शुद्धी' विधीद्वारे विवाहबंधनात अडकली. आता लग्नाच्या काही महिन्यानंतर समांथाने तिच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल आणि राजसोबतच्या केमिस्ट्रीबद्दल मनमोकळे भाष्य केले. २०२१ मध्ये अभिनेता नागा चैतन्य याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर ती भावनिकदृष्ट्या खूप खचली होती, असे तिने सांगितले. मात्र दिग्दर्शक राज निदिमोरूनं तिचा हात धरत तिला नव्याने उभं राहण्याची ताकद दिली, असेही ती म्हणाली.
नागा चैतन्यशी झालेल्या घटस्फोटानंतरच्या काळाबद्दल बोलताना समांथा भावुक झाली. ती म्हणाली, "जेव्हा माझा घटस्फोट झाला, तेव्हा मी स्वतःला पूर्णपणे कोंडून घेतलं होतं. मला पुन्हा कधी कोणावर अवलंबून राहता येईल किंवा मी कोणावर प्रेम करू शकेन, असं वाटलं नव्हतं. पण मी प्रेम आणि मैत्री स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार केलं. राजमुळे मी एक अधिक चांगली व्यक्ती बनले आहे".
राजसोबतच्या दैनंदिन आयुष्याबद्दल समांथाने गमतीशीर माहिती दिली. ती म्हणाली की, "आम्ही दोघेही त्या 'इरिटेटिंग' जोडप्यांसारखे आहेत, सगळी कामं एकत्र करतो. एकत्र खेळतो आणि व्यायामही एकत्रच करतो. जर मला एका दिवसासाठी जरी बाहेरगावी जायचं असेल, तर मला खूप त्रास होतो. हा फक्त 'हनिमून फेज' नाही. कारण आतापर्यंत बराच काळ लोटला आहे".
समांथाने सांगितले की तिच्या जवळच्या मित्रांनाही तिच्यातील सकारात्मक बदल जाणवतो आहे. एका जुन्या मैत्रिणीने तिला व्हॉइस नोट पाठवत म्हटले की, "खूप दिवसांनी तू घुसमट न होता जगताना दिसतेस". समांथानं पुढे स्पष्ट केले की, आता तिला कोणासमोरही कोणताही दिखावा करण्याची गरज वाटत नाही. ती आता अधिक मोकळेपणाने आणि स्वतःसाठी जगतेय. इंडस्ट्रीतील १६ वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलताना तिने सांगितले की, आता तिला लोकांच्या कौतुकाचा किंवा टोकाच्या टीकेचा फारसा फरक पडत नाही.
समांथा आणि राज या दोघांनी तेलुगू चित्रपट 'Maa Inti Bangaaram'मध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटात राज क्रिएटर असून समांथा अभिनेत्री आणि निर्मातीच्या भूमिकेत आहे. राजबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत समांथा म्हणाली, "एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला कोणत्याही भूमिकेत जाण्यासाठी मोकळीक हवी असते. दिग्दर्शकाला आपण मूर्ख किंवा काम करण्यास असमर्थ वाटू का, याची भीती मनात असते. राजच्या बाबतीत बोलायचं तर, आता खूप उशीर झाला आहे. आता मी त्याच्यासमोर स्वतःची कितीही फजिती करून घेतली, तरी तो मला सोडून जाऊ शकत नाही", असं मिश्किल विधानही तिने यावेळी केलं. दुसरीकडे, समांथाचा माजी पती नागा चैतन्य यानेही शोभिता धुलिपालाशी विवाह केला असून, दोघेही आता आपापल्या आयुष्यात स्थिरावले आहेत.