Rampaat Marathi Movie Review : 'रंपाट' अपेक्षा ठरल्या फोल
By अजय परचुरे | Updated: August 8, 2023 20:27 IST2019-05-17T16:19:29+5:302023-08-08T20:27:58+5:30
रंपाट सिनेमाची कथा ही टीपीकल बॉलिवूडपटाला शोभेल अशीच आहे.

Rampaat Marathi Movie Review : 'रंपाट' अपेक्षा ठरल्या फोल
- अजय परचुरे
तेरे स्टोरी मैं है दम ,तो दुनिया चूमेगी कदम हा रंपाट सिनेमातच आलेला संवाद . जर का स्टोरीमध्ये दम असेल तरच सिनेमा रसिकमान्य प्रेक्षकांना आवडतो. रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज रसायन आहे. नटरंग,बालगंधर्व ,टाईमपास ,न्यूड असे सिनेमा देणारा रवी जाधव हा लेखक दिग्दर्शक अवलिया आपल्या स्टोरीमध्ये दम असल्याने आणि सफाईदार अव्वल दर्जाचा सिनेमा मांडण्यासाठी ओळखला जातो. मात्र यावेळी रवी जाधवच्या स्टोरीमध्येच तितकासा दम नसल्याने रवी जाधवच्या पठडीतील सिनेमा यावेळी रंपाट ठरू शकलेला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटत आहे. निव्वळ मनोरंजन ,रोमान्स , संगीत असा ठासून भरलेला मसाला जरी असला तरी कथेतच दम नसेल तर कैसे चूमेगी दुनिया हा प्रश्न नक्कीच उदभवतो.
रंपाट सिनेमाची कथा ही टीपीकल बॉलिवूडपटाला शोभेल अशीच आहे. मिथुन ( अभिनय बेर्डे) आणि विजया ऊर्फ मुन्नी(काश्मिरा परदेशी) सिनेमाच्या चंदेरी दुनियेत आपल्यालाही जाता यावे याच्या स्वप्नात महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या गावांमध्ये हे दोघंही वाट्टेल ते करून या स्वप्ननगरीत जाण्यासाठी संधीची वाट पाहत असतात. मिथुनची आई काळूबाइर्ने(प्रिया बेर्डे) पतीच्या मरणानंतर जगण्यासाठी सिनेमाला आपलंसं केलेलं आहे आणि जाणता अजाणता हा प्रभाव मिथुनवर पडून तो पूर्णपणे फिल्मी झालाय. सोलापूरचा मिथून आणि कोल्हापूरची मुन्नी या सिनेविश्वात येण्यासाठी मुंबईत धाव घेतात. आणि आपल्या पालकांना सुख,शांती,समाधान मिळवून देण्यासाठी झटपट यश मिळवण्यासाठी झटतात. त्यात त्यांना सिनेविश्वात काम मिळवण्यासाठी येणाºया असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. ह़्यात त्यांना साथ मिळते ती फटाफटती ( कुशल बद्रिकेची) मात्र फटाफटची साथ, मिथुन आणि मुन्नीचं स्ट्रगल,त्यांच्यासमोर येणाºया असंख्य अडचणी ह्यांच्यातून वाट काढत काढत यशाच्या मार्गावर पोहचतात का ?आपल्या पालकांच्या आशा पूर्ण करू शकतात का ? ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सिनेमा पाहिल्यावरच मिळेल. पण थोडक्यात रंपाट सिनेमाचा हा कथासार आहे.
उतकृष्ट सादरीकरण, श्रवणीय संगीत, उत्तम संवाद , असं संपूर्ण पॅकेज म्हणजे रवी जाधवचा सिनेमा हे आत्तापर्यंतचे समीकरण आहे. न्यूड सारखा अतिशय उत्कृष्ट सिनेमा दिल्यानंतर त्याच पठडीतला सिनेमा करण्यापेक्षा एक धमाल येडछाप सिनेमा करण्यासाठी रवीने रंपाटची निवड केली. मात्र यावेळी रवीची ही फोडणी पाहिजे तशी जमलेली नाही. अंबर हडप,गणेश पंडित आणि रवी जाधव ही बालकपालक सिनेमाचं हिट त्रिकूट रंपाटमुळे पुन्हा एकत्र आलं आहे. बालकपालक चे मसालेदार संवाद आणि कथा रंपाटमध्ये मात्र जुळुन आलेली नाही. अनेक प्रसंगामध्ये अनेक नानाविध प्रश्न समोर येतात. चंदेरी दुनियेत आलेल्या मिथुन आणि मुन्नीचा स्ट्रगल काळ हा अतिशय तकलादू स्वरूपाचा वाटतो. मुळात सिनेविश्वात काम मिळवण्यासाठी नानाविध लोकांना भेटावं लागतं. अनेक वर्ष काम करूनही अपेक्षित काम मिळण्याची कोणतीही स्थिती निर्माण न होऊ शकणारे अनेक तरूण तरूणी आजही फिल्मसिटीच्या बाहेर येरझारा घालताना दिसत असतात. मात्र रंपाटमध्ये हे चित्रिण फारच वरवर करण्यात आलं आहे . रवीचा सिनेमा म्हणजे हमखास मनोरंजन हे एक सूत्र आहे. रवीने जसे उत्तम आशयघन सिनेमे केले आहेत त्याचप्रमाणे उत्तम मसालापट सिनेमाही केला आहे. मात्र रंपाटमध्ये हा मसाला थोडा फिका पडला आहे. विनोद ,संगीत या आघाडीवर हा सिनेमा पाहिजे तितक्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे.
मिथुनच्या भूमिकेतील अभिनय बेर्डे आणि मुन्नीच्या भूमिकेतील काश्मिरा परदेशीने आपल्या भूमिकेत जान ओतली आहे. अभिनय आपल्या प्रत्येक सिनेमागणिक अधिकाअधिक प्रगल्भ नट होत चालला आहे. मात्र संहितेच्या अपयशाने ह्या भूमिकांना म्हणावा तसा उठाव आलेला नाही. प्रिया बेर्डे,कुशल बद्रिके आणि अभिजित चव्हाण यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. निव्वळ टाईमपास व्हावा या उद्देशाने एकदा पाहता येईल असा हा सिनेमा आहेत. पण रवी जाधवच्या कल्पक डोक्यातून निघणाºया आयडियाच्या कल्पनेत रमणाºया प्रेक्षकांचा थोडा भ्रमनिरास नक्कीच होण्याची शक्यता आहे.