आदर्शवादी कर्तृत्वाचा चरित्रपट

By Admin | Updated: November 28, 2015 00:34 IST2015-11-28T00:34:39+5:302015-11-28T00:34:39+5:30

एखादे राजकीय व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या जीवनावर चित्रपट करायचा म्हणजे त्याचा माहितीपट होण्याची शक्यता जास्त असते आणि असे काही झाले

The protagonists of idealistic roles | आदर्शवादी कर्तृत्वाचा चरित्रपट

आदर्शवादी कर्तृत्वाचा चरित्रपट

एखादे राजकीय व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या जीवनावर चित्रपट करायचा म्हणजे त्याचा माहितीपट होण्याची शक्यता जास्त असते आणि असे काही झाले तर त्याचा थेट परिणाम त्या चित्रपटावर होतो. ‘महानायक’ या चित्रपटाने मात्र या धोक्याला बगल देत एक चरित्रपट सादर केला आहे. महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर आधारित हा चित्रपट म्हणजे नव्या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाची करून दिलेली ओळख आहे.
भटक्या समाजाची पार्श्वभूमी असलेले वसंतराव नाईक स्वकर्तृत्वाने यशाची एक एक पायरी वर चढत गेले, तरी त्यांची मुळे मात्र जमिनीशी घट्ट नाते सांगत राहिली. त्यांचे हे सगळे जीवनकार्य या चित्रपटात रेखाटले आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी शिक्षण पूर्ण केले आणि ते वकील झाले. पण त्यांच्या मनात समजाविषयी अपार तळमळ होती आणि त्यातूनच भरीव असे कार्य करण्याच्या हेतूने ते राजकारणात उतरले.
स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत स्वत:चा ठसा उमटवला. प्रथम ते विदर्भातल्या पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष बनले. नंतर त्या वेळच्या जुन्या मध्य प्रदेशाचे ते उपमंत्री झाले. तसेच तेव्हाच्या मुंबई राज्यात त्यांनी कृषी, महसूल अशी खाती सांभाळत दखल घेण्याजोगी कामगिरी बजावली. कमाल जमीन धारणा कायदा, मालगुजरी मुक्त महाराष्ट्र अशी मोठी कार्ये त्यांच्या हातून पार पडली. शेतकरी कुटुंबातून आल्याने त्यांना शेतकऱ्यांविषयी आस्था होती आणि त्यातूनच शेती समृद्धीकरणाकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष पुरवले. कोराडी, चंद्रपूर, परळी अशी विद्युतनिर्मिती केंद्रे; तसेच जायकवाडी, अरुणावती अशा धरणांची निर्मिती त्यांच्या कारकिर्दीत झाली. कृषी विद्यापीठांची स्थापना, हायब्रीड बियाणांची निर्मिती, आदिवासी आणि आश्रम शाळा काढून त्यांनी ग्रामीण शिक्षणाचा विकास केला. त्यांचे हे सगळे कार्य या चित्रपटात मांडले आहे. पण केवळ एवढेच दाखवून हा चित्रपट थांबत नाही; तर हे सर्व करत असतानाच त्यांना पदोपदी आलेल्या अनेक अडचणींचा मागोवाही हा चित्रपट घेतो. अंतर्गत पक्षीय राजकारणाला तर त्यांना तोंड द्यावे लागलेच; पण नैसर्गिक आपत्तीसुद्धा त्यांच्या काळात रौद्र रूप दाखवत होत्या. कोयनेचा भूकंप असो किंवा १९७२मध्ये राज्यात पडलेला दुष्काळ असो; राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांना त्याची थेट झळ पोहोचली. पण न डगमगता त्यांनी ही आव्हाने स्वीकारली आणि हे उत्तरदायित्व पार पाडत सक्षम राज्यकारभार करून दाखवला.
वसंतराव नाईक यांचे बालपण, शिक्षण, वकिली व्यवसाय ते राजकारण असा विस्तृत पट या चित्रपटात आहे आणि दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी तो मांडताना त्याला माहितीपेक्षा चित्रात्मक मूल्य कसे प्राप्त होईल याकडे लक्ष पुरवले आहे. त्यामुळे या कथेतली रंजकता आणि नायकाच्या आयुष्याबद्दल वाटणारी उत्सुकता टिकून राहिली आहे.
चरित्रपट म्हटल्यावर अनेक बंधने येतात, पण दिग्दर्शकाने हे आव्हान पेलण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. जुन्या काळाची योग्य मांडणी करत त्या वेळच्या संदर्भांची पेरणी त्यांनी यात केली आहे. त्यांच्यासह संवादलेखन करणारे नरेंद्र इंगळे यांनी मिळून ही जबाबदारी नीट पार पाडली आहे. मात्र चित्रपट बऱ्यापैकी लांबला आहे. त्याला कातरी लावली गेली असती, तर हे चरित्र अधिक आटोपशीर झाले असते.
चिन्मय मांडलेकर याने वसंतरावांची भूमिका रंगवत त्याच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. वसंतरावांची युवावस्था, तसेच त्यांचे राजकीय स्वरूप चिन्मयने उत्तम साकारले आहे. या भूमिकेत तो चिन्मय मांडलेकर न वाटता वसंतराव नाईकच वाटतो यातच काय ते आले. वसंतरावांच्या चेहऱ्याशी त्याचे साधर्म्य दिसावे यासाठी त्याला मोठी साथ मिळाली आहे ती प्रोस्थेटिक रंगभूषेची! वाढत जाणाऱ्या वयासोबत रंगभूषेत पडत जाणारा फरक दाखवण्याचा चांगला प्रयत्न यात केला गेला आहे. यातल्या वसंतरावांच्या तरुणपणातल्या रंगभूषेत कमतरता जाणवत असली, तरी प्रौढ वयातली त्यांची रंगभूषा मात्र उठावदार झाली आहे. निशा परुळेकर, रवी पटवर्धन, भारत गणेशपुरे, जयराज नायर आदी अनेक कलावंतांनी यात त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका अचूक साकारल्या आहेत. वसंतराव नाईक यांचे आयुष्य आणि त्यांचे
कर्तृत्व अनुभवायचे असल्यास हा चित्रपट ती इच्छा नक्कीच पूर्ण करणारा आहे.

Web Title: The protagonists of idealistic roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.