पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 16:55 IST2025-06-06T16:30:22+5:302025-06-06T16:55:05+5:30
पडद्यावर खलनायिकी भूमिका गाजवणाऱ्या दिपक शिर्केंना 'बाप्पा' हे नाव कसं पडलं? वाचा इंटरेस्टिंग किस्सा

दिपक शिर्के हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आहेत.
वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपट तसेच हिंदी चित्रपटांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे.
'एक शून्य शून्य' या मालिकेतील हवालदार एक शून्य शून्य ही त्यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती.
सध्या दिपक शिर्के दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. अलिकडेच त्यांनी 'इट्स मज्जा' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, दिपक शिर्के त्यांना बाप्पा हे नाव कसं पडलं? यामागचा मजेशीर किस्सा शेअर केला. त्यावेळी ते म्हणाले, "आम्ही एका नाटकाच्या दौऱ्यावर नागपूरला गेलो होतो. जवळपास वीस एक दिवसांचा तो दौरा होता. तर तिथली एक भाषा आहे की खाऊन राहायचं का रे बाप्पा? तिकडे चांगलं जेवण मिळून राहतं बाप्पा...!' म्हणजे ते लोक कोणत्याही वाक्याच्या शेवटी बाप्पा हा शब्द वापरायचे."
त्यानंतर ते म्हणाले,"मग मी त्या शब्दाचा वापर करू लागला. असं करता करता मला बाप्पा हे नाव पडलं. शिवाय माझ्या आजोबांना पण लोक बाप्पा म्हणायचे." असा मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
'थरथराट', 'दे दणादण', 'एक गाडी बाकी अनाडी', 'अग्निपथ', 'तिरंगा' यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.
दरम्यान, १९९३ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'तिरंगा' या चित्रपटात दिपक शिर्के यांनी प्रलयनाथ गेंडास्वामी ही भूमिका साकारुन प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटामुळे कलाविश्वात त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली.