Rajeshwari Kharat : "दिग्दर्शकाचा फोन, स्टुडिओमध्ये बोलवलं अन्...", राजेश्वरी खरातला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 10:59 IST2025-06-16T10:33:27+5:302025-06-16T10:59:31+5:30
Rajeshwari Kharat : रिहर्सल सुरु असताना आला फोन, राजेश्वरीला थेट रडूच कोसळलं

'सैराट' आधी नागराज मंजुळेंचा गाजलेला सिनेमा 'फँड्री'. या सिनेमाची गोष्ट, कलाकारांचा अभिनय सगळंच गाजलं. जब्या आणि शालूची जोडी तर आजही वेड लावते.
शालूची भूमिका करणारी अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या चर्चेत आहे. तिने कधी धर्मांतर तर कधी जब्या म्हणजेच सोमनाथसोबत लग्नाच्या चर्चा यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतीच राजेश्वरी खरातने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी तिने कास्टिंग काऊचचा आलेला अनुभव सांगितला. भूमिकेसाठी तडजोड करण्यासाठी तिला अनेकदा विचारणा झाली.
मुलाखतीत राजेश्वरी खरात म्हणाली, "मलाही अनुभव आला आहे. मला आधीच गार्गी ताईंनी(नागराज मंजुळेंची पत्नी) याची कल्पना दिली होती. लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, काय काय विचारु शकतात याबद्दल त्यांनी मला सांगितलं होतं. यासाठी आधी तू स्ट्राँग पाहिजे असं त्या म्हणाल्या होत्या."
"मी नाव घेणार नाही पण एका दिग्दर्शकाचा मला फोन आला होता. तेव्हा एक स्क्रिप्ट होती तर त्याच्या रिहर्सलसाठी गेले होते. मला त्या दिग्दर्शकाने कॉल करुन विचारलं की कुठे आहेस? किती वेळ आहे? त्यांनी मला त्यांच्या स्टुडिओला बोलवलं होतं. मी म्हणाले मला वेळ लागेल. मी रिहर्सल करत आहे."
"मी पुढे विचारलं की काय झालं? काय काम आहे का? तर ते म्हणाले, 'तू मला विचारायचं नाही काय काम आहे. मी तुला सांगितलं की तू लगेच इथे आली पाहिजे."
"मी तिथे रिहर्सलला दुसऱ्या दिग्दर्शकासमोर रडायलाच लागले. मग त्यांनी मला समजावलं की अशा गोष्टी होत राहतात. आता पुढे त्या दिग्दर्शकाचे फोन उचलू नको असं ते म्हणाले."
"दुसरं म्हणजे मला रोलसाठी कॉम्प्रमाईज करायलाही विचारलं आहे. लोक आजकाल असं थेट विचारायला घाबरतही नाहीत. मुळात त्यांना असं विचारावसंच का वाटतं असा मला प्रश्न पडतो."
"हे चुकीचं आहे. मी सरळ सांगितलं की मी असली कामं करत नाही. पुन्हा मला असं काहीतरी विचारायचं नाही."