Arjun Rampal : २६/११ च्या हल्ल्याचा 'धुरंधर'मध्ये घेतला बदला; १७ वर्षे ट्रॉमामध्ये होता अर्जुन रामपाल, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:05 IST2026-03-23T11:53:14+5:302026-03-23T12:05:04+5:30
Arjun Rampal : अर्जुनने २६/११ च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित एक थरारक आठवण शेअर केली.

'धुरंधर'मध्ये मेजर इक्बालची भूमिका साकारून अर्जुन रामपाल सध्या प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवत आहे. इंडिया टुडे ग्रुपशी खास संवाद साधताना अर्जुनने २६/११ च्या मुंबई हल्ल्याशी संबंधित एक थरारक आठवण शेअर केली.

अर्जुनने सांगितलं की, त्याचा वाढदिवस २६ नोव्हेंबरलाच असतो. त्या दिवशी तो स्वतः या जीवघेण्या हल्ल्याचा बळी ठरू शकला असता, मात्र एका मित्राला उशीर झाल्यामुळे त्याचा जीव वाचला. तब्बल १७ वर्षांनंतर अर्जुनला त्या घटनेचा बदला घेण्याची संधी मिळाली.

रविवारी मुंबईत पार पडलेल्या 'हॅलो! हॉल ऑफ फेम' अवॉर्ड्समध्ये अर्जुनचा सन्मान करण्यात आला. आपल्या भाषणादरम्यान त्याने २००८ च्या मुंबई हल्ल्याचा भयानक अनुभव आठवला.

अर्जुनने सांगितलं की, त्या मानसिक धक्क्याने (ट्रॉमा) त्याला आदित्य धर यांच्या 'धुरंधर' चित्रपटातील २६/११ च्या महत्त्वाच्या दृश्यात काम करण्यास मदत केली. आपल्या मित्राचे आभार मानत तो काळ किती भयानक होता, हे स्पष्ट केलं. 'धुरंधर' चित्रपटात तो सीन करणं अभिनेत्यासाठी बदला घेण्यासारखंच होतं.

"२००८ मध्ये मी याच हॉटेलमध्ये होतो. मी माझ्या मित्रांना न्यायला जात होतो. आम्ही ताज हॉटेलच्या दिशेनेच निघालो होतो, कारण आम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचा होता. माझा वाढदिवसही २६ नोव्हेंबरलाच येतो."

"आमचा एक मित्र तयार होत होता, तोपर्यंत आम्ही बारमध्ये ड्रिंक्ससाठी गेलो. देव त्याचे भले करो, कारण त्याच वेळी बॉम्बस्फोट झाला. मी तो आवाज ऐकला होता, पूर्ण काचा हलू लागल्या होत्या. नक्की काय घडलं, हे आम्हाला समजेना."

"१० मिनिटांनंतर समजलं की काहीतरी गँगवॉर सुरू झालं आहे. आमचे फोन वाजू लागले, कुलाबा परिसरात जाऊ नका तिथे हल्ले सुरू झाले आहेत, असं आम्हाला सांगण्यात आलं. त्यानंतर २०-३० मिनिटांत आम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलं."

"हॉटेल मालक आदर्श जाटिया यांचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला गोड खाऊ घातलं आणि सांगितलं की तुम्ही आजची रात्र इथेच थांबू शकता, पण आम्ही कोणालाही बाहेर जाऊ देऊ शकत नाही, कारण बाहेरचं वातावरण सुरक्षित नाही."

"मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी २६/११ चे ते भयानक दृश्य पाहिलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही घरी परतत होतो, तेव्हा गाडी चालवताना मी तीन वेळा थांबलो, मला वाटलं की मी आजारी पडेन."

"जेव्हा आदित्य धर यांनी मला २६/११ चा सीन सांगितला, तेव्हा मला समजलं की मला या घटनेचा बदला घेण्याची संधी मिळेल. मी 'धुरंधर'मध्ये फक्त तेच केलं आहे. शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की- भारत माता की जय!" असं अर्जुनने म्हटलं आहे.

'धुरंधर' चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या ४ दिवसांत ४०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटातील अर्जुन आणि रणवीर सिंह यांचे फाईट सीन्स सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

चित्रपटात अर्जुन रामपाल आणि रणवीर सिंग यांच्यासोबत राकेश बेदी, संजय दत्त, सारा अर्जुन यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता.

















