प्रार्थनाला करायचेत नायिकाप्रधान चित्रपट
By Admin | Updated: November 20, 2015 02:41 IST2015-11-20T02:41:18+5:302015-11-20T02:41:18+5:30
ही अभिनेत्री तशी या वर्षी म्हणजे २०१५मध्येच चित्रपटातून जास्त प्रसिद्ध झाली़़़ पण, तिने अभिनयाला सुरुवात केली २००९ मध्येच. त्या चित्रपटाने बरीच पसंतीही मिळवली...

प्रार्थनाला करायचेत नायिकाप्रधान चित्रपट
ही अभिनेत्री तशी या वर्षी म्हणजे २०१५मध्येच चित्रपटातून जास्त प्रसिद्ध झाली़़़ पण, तिने अभिनयाला सुरुवात केली २००९ मध्येच. त्या चित्रपटाने बरीच पसंतीही मिळवली... तो चित्रपट म्हणजे ‘रिटा’. त्यानंतर ती हिंदीतील गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’मध्येही दिसली. त्याशिवाय ‘मायलेक’, ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी तर ‘लव्ह यू मिस्टर कलाकार’ आणि ‘बॉडिगार्ड’ या हिंदी चित्रपटांतही तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. अगदी मराठीतील चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णीसोबत तिने ‘मितवा’मध्ये मुख्य भूमिकाही साकारली होती. पण तोपर्यंत ती म्हणावी तितकी पुढे आली नाही, असं म्हटलं तरी चालेल. तिला खरा ब्रेक मिळाला तो वैभव तत्त्ववादी, नेहा महाजन आणि भूषण प्रधान असलेल्या ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटानंतर. आता यावरून ती अभिनेत्री म्हणजे ‘प्रार्थना बेहेरे’ हे समजलं असेलच तुम्हाला. या चित्रपटानंतर प्रार्थना लगेचच दोन चित्रपटांत म्हणजे ‘तुझ्या विना मर जावा’ आणि ‘बायकर्स अड्डा’ या वेगळ्याच विषयांवरील चित्रपटात पाहायला मिळाली. या मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील कामाबद्दल प्रार्थनाने ‘सीएनएक्स’शी आपले अनुभव शेअर केले.
हिंदीमध्ये अनेक नायिकाप्रधान चित्रपट पाहायला मिळतात. म्हणजे अगदी आत्ता आत्ताच नाही, तर मी लहानपणापासूनच ज्या अभिनेत्रीला फॉलो केले आहे ती म्हणजे श्रीदेवी. त्यांचा दोन वर्षे आधीही ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपट आला. केवळ हाच नाही, तर अगदी पहिल्या चित्रपटापासून त्यांनी स्वत:च्या अभिनयावरच चित्रपट गाजवले. त्यामध्ये अगदी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचेही उदाहरण देता येईल. मिस्टर इंडिया म्हटलं की अनिल कपूरसोबत श्रीदेवी डोळ्यांसमोर आल्यावाचून राहत नाही. तसेच नायिकाप्रधान चित्रपट आता मराठीत येऊ लागले आहेत. पूर्वी ते प्रमाण कमी होते हे मान्य; पण माझ्यासारख्या अभिनेत्रींनी नायिकाप्रधान चित्रपटांसाठी प्रयत्न करणे खरोखरच गरजेचे आहे.
मराठी चित्रपट हिंदीपेक्षा दर्जात्मक
बडोद्याला असताना मला मराठी चित्रपटांबद्दल खूपच कमी माहिती होती. मराठी चित्रपट म्हणजे फक्त कॉमेडीपर्यंतच मर्यादित आहे, असा माझा समज होता. पण ‘वळू’ किंवा ‘श्वास’सारखे चित्रपट आॅस्करला पोहोचताच माझा हा गैरसमज दूर झाला. इथे केवळ कॉमेडी चित्रपटच तयार होत नाहीत तर जागतिक स्तरावर प्रशंसा केले जाणारे चित्रपटही होतात हे समजलं. इतकंच नाही, तर अमराठी लोकही आता मराठी चित्रपटांसाठी प्रेक्षागृहात जाऊ लागले आहेत. खरं सांगायचं तर हिंदी चित्रपटांतील मोजक्याच चित्रपटांमध्ये दर्जात्मक आशय असलेले पाहायला मिळते मात्र मराठी चित्रपटांमध्ये मनोरंजनाबरोबरच काहीतरी संदेशही समाजाला मिळतो.
चित्रपट चांगला असणे सर्वांत महत्त्वाचे
आज चित्रपटांमध्ये मनोरंजनात्मक चित्रपटांपेक्षा क्लासी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो आणि मराठी चित्रपटांना थिएटर्सबरोबरच प्राइम टाइम मिळायला प्रॉब्लेम येतो या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनेक मतं मांडली जात आहेत. पण मला असं
वाटतं, की या दोन्ही मुद्द्यांचं एकच उत्तर आहे, की तुमचा चित्रपट चांगला असेल तर तो नक्कीच चालेल. ‘कोर्ट’ आणि ‘कॉफी आणि बरंच काही’ हे चित्रपट पूर्णत: वेगळ्या धाटणीचे आहेत हे मान्य आहे, पण एक प्रेक्षकवर्ग असाही आहे, की ज्यांना हे दोन्ही चित्रपट तितकेच आवडले; आणि प्राइम टाइमच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथंही तेच उत्तर आहे, की जर तुमचा चित्रपट, त्याची कथा, त्यातील आशय पॉवरफूल असेल तर तो चित्रपट कोणताही स्लॉट मिळाला तरी चालतोच. त्यामुळे चित्रपट चांगला असणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
मराठी चित्रपटास प्राधान्य देणे गरजेचे
आज मराठी चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचला आहे, पण मराठी माणसालाच मराठी चित्रपटाचं महत्त्वं नसल्यासारखं झालं आहे. याउलट साऊथमध्ये एका आठवड्याला पाच चित्रपट प्रदर्शित होतात, पण त्यातील एखाददुसऱ्या स्क्रीनलाच हिंदी चित्रपट लागतो. साऊथ इंडियन लोक त्यांच्याच भाषेतील चित्रपट पाहण्यास पूर्वीही पसंती देत होते आणि आजही तेच चित्र आहे. मग हे मराठीत का होत नाही? मराठी चित्रपटाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
(शब्दांकन : मृण्मयी मराठे)