मराठमोळ्या संस्कृतीत ‘मित्रा’चा फायर
By Admin | Updated: July 15, 2015 13:22 IST2015-07-15T02:22:50+5:302015-07-15T13:22:21+5:30
दीपा मेहताचा ‘फायर’ आठवतोय! भारतीय पडद्यावर प्रथमच लेस्बीयन संबंध (दोन स्त्रियांमधील लैंगिक संबंध) आले आणि अक्षरश: आग लागली.

मराठमोळ्या संस्कृतीत ‘मित्रा’चा फायर
दीपा मेहताचा ‘फायर’ आठवतोय! भारतीय पडद्यावर प्रथमच लेस्बीयन संबंध (दोन स्त्रियांमधील लैंगिक संबंध) आले आणि अक्षरश: आग लागली. हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहांमध्ये झळकला, तेव्हा प्रचंड वाद निर्माण झाला. अगदी जाळपोळीच्या घटनाही घडल्या. तब्बल १७ वर्षांनंतर याच विषयावर एका चित्रपटाची कथा आकाराला आली आहे आणि तीदेखील मराठीमध्ये.
‘बायोस्कोप’ या चार दिग्दर्शकांनी निर्मित केलेल्या चित्रपटामध्ये ‘मित्रा’ ही कथा लेस्बीयन याच विषयावर गुंफण्यात आली आहे. काळ कितीही बदलला तरी अजूनही या विषयावर मोकळेपणाने बोलण्याइतकीच काय, पण ती स्वीकारण्याएवढीही मानसिकता समाजात अजूनही निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळेच हा चित्रपट कशा पद्धतीने स्वीकारला जातोय, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत. त्यात अमेरिकेतील समलिंगी संबंधांना मान्यता आणि भारतातील समलिंगी संबंधांना मनाई करणारे ३७७ कलम या पार्श्वभूमीवर ‘मित्रा’ येतोय.
खरंतर ‘मित्रा’ ही अत्यंत तरल कथा. संवेदनशील कवी संदीप खरे यांच्या ‘उदासित या कोणता रंग आहे’ या कवितेवर हा चित्रपट आधारित आहे. पण मूळ प्रेरणा ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्रा’ याच कथेची आहे. तिच्या प्रेमात पडलेला ‘तो’. पण तिचा प्रतिसाद नाही. पण त्याचे कारण म्हणजे ती अडकलीय तिसऱ्या ‘ती’ मध्ये. वीणा जामकरने साकारलेली ‘ती’ आणि कवी संदीप खरे यांचा ‘तो’ यांच्याभोवतीची ही कथा रवी जाधव यांच्यासारख्या तेवढ्याच संवेदनशील दिग्दर्शकाने हा लघुपट पडद्यावर साकारला आहे. या लघुपटावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोरही उमटली आहे. पण संस्कृतीरक्षक म्हणविणारे या तरलतेपेक्षा त्यातील विषयालाच विरोध करू शकतात. मराठीमध्ये मधल्या काळात काही धाडसी विषयांवरील चित्रपटही आले. ‘बालक- पालक’सारख्या चित्रपटात पौगंडावस्थेतील लैंगिक आकर्षण रवी जाधव यांनीच मांडले होते. परंतु, त्यामध्ये कोठलाही व्हल्गरपणा नव्हता. ‘मित्रा’मध्येही त्यांनी हे पथ्य पाळले आहे.
समलिंगी संबंध ही एक नैसर्गिक भावना आहे. स्त्री-पुरुषामध्ये जसे प्रेम असते तसेच समलिंगी स्त्री-पुरुषांमध्ये असते. समलैंगिकता हा काही आजार नाही, ती निसर्गाने दिलेली देणगी आहे. तिचा आपण आदर करायला पाहिजे. कोणत्याही व्यक्तीचे आकर्षण वाटणे अत्यंत स्वाभाविक असते. समाजानेदेखील या संबंधांचा आदर करायला पाहिजे.
- विद्या बाळ, सामाजिक कार्यकर्त्या
अमेरिकेने समलिंगी संबंध असलेल्या व्यक्तींना विवाहाची मान्यता दिल्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या विषयावर पूर्वीही वादविवाद होते; मात्र आता अशा चर्चेवर कोणतीही धक्कादायक प्रतिक्रिया उमटणार नाही. ‘मित्रा’ ही कथा चांगली असेल तर ती तितकीच स्वीकारली जाईल. कारण ते समाजातील शेवटी वास्तव आहे. त्यामुळे चित्रपटाला कोणताही विरोध होणार नाही. कथेचा विषय जरी पटला नाहीतरी प्रेक्षक तो सहन नक्कीच करू शकतील.
- बिंदुमाधव खिरे, संस्थापक अध्यक्ष, समपथिक ट्रस्ट
‘समलैंगिक व्यक्तींना एकमेकांबरोबर शारीरिक आणि मानसिक आनंद मिळतो. सुरुवातीला स्वत:चा स्वत:ला स्वीकार होणे आणि कालांतराने समाजाने त्यांना स्वीकारणे अशा खूप मोठ्या झगड्याला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर येते. या गोष्टीमुळे लग्न, करिअर अशा सर्वच टप्प्यांवर अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. आपल्याकडे पालक मुळात ही गोष्ट सहजासहजी स्वीकारत नाहीत. समलैंगिक आहोत, याचे योग्य निदान गरजेचे आहे.
- उज्ज्वल नेने, मानसोपचार तज्ज्ञ
आपली हिंदू संस्कृती सद्विचार, सद्वर्तन, साधना, उपासना, योगविद्या यांचा पुरस्कार करते. मात्र हल्लीची पिढी पाश्चात्त्य संस्कृतीमुळे अधिकाधिक ‘भोगवादा’च्या आहारी चालली आहे. युवापिढी स्वत:ची संस्कृती सोडून दुसऱ्याच्या संस्कृतीचे अनुकरण करण्यात धन्यता मानत आहे. समलैंगिक संबंधांना चालना देणाऱ्या अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्डानेच कात्री लावली पाहिजे. समाजाची दिशाभूल करण्याला अशा गोष्टी हातभार लावत आहेत.
- सुनील घनवट, महाराष्ट्र संघटक, हिंदू जनजागृती समिती