अभिव्यक्तीबाबत असंवेदनशील होत चालल्याचा जगभर संदेश!
By Admin | Updated: November 30, 2015 02:08 IST2015-11-30T02:08:02+5:302015-11-30T02:08:02+5:30
पुन्हा एकदा तोच तमाशा झाला. शाहरूख खाननंतर आता आमीर खान लक्ष्य ठरला. त्याच्या वक्तव्यावरून देशभर प्रचंड गहजब झाला. दोन्ही अभिनेत्यांच्या वक्तव्यांबाबत देशात

अभिव्यक्तीबाबत असंवेदनशील होत चालल्याचा जगभर संदेश!
पुन्हा एकदा तोच तमाशा झाला. शाहरूख खाननंतर आता आमीर खान लक्ष्य ठरला. त्याच्या वक्तव्यावरून देशभर प्रचंड गहजब झाला. दोन्ही अभिनेत्यांच्या वक्तव्यांबाबत देशात, तसेच बॉलीवूडमध्येही टोकाचे मतभेद दिसून आले, याला अनैसर्गिक म्हणता येऊ शकत नाही. जेव्हा एखादा मुद्दा भावनेशी जोडला जातो तेव्हा असाच तीव्र विरोध दिसून येतो. तथापि, शाहरूख खान आणि आमीर खान यांनी असहिष्णुतेबाबत जे काही म्हटले त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानून जर त्यावर चर्चा झाली असती तर एखादा सार्थक पैलू समोर येऊ शकला असता; परंतु तसे झाले नाही. दोघांच्याही वक्तव्यांचे आपापल्या परीने अर्थ लावले गेले. सर्वात लाजिरवाणी बाब म्हणजे दोन्ही अभिनेत्यांवर प्रचंड वैयक्तिक हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमुळे केवळ सार्थक चर्चेची संधीच हातची गेली नाही तर अभिव्यक्तीबाबत आम्ही प्रचंड असंवेदनशील होत चाललो असल्याचा संदेश जगभर गेला. वक्तव्याच्या मुद्द्यावर तार्किक वादविवादाऐवजी वैयक्तिक हल्ल्यांसह धार्मिक आधारावर देशद्रोही म्हणण्यापर्यंत मजल गेल्यानंतर विरोधाच्या नावाखाली आपण किती खाली घसरू शकतो हे जाणवले. या वक्तव्यांना विरोध असलेल्या वर्गाकडून शाहरूख आणि आमीर खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकावा, असा संदेश सोशल मीडियावर दिला जात आहे. डिसेंबरमध्ये शाहरूखचा चित्रपट दिलवाले प्रदर्शित होत असून पुढील वर्षी आमीर खानचा दंगल प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट न पाहण्याचा संदेश देणे तर्कहीन आहे. आमीर खान एका आॅनलाइन साइटची प्रसिद्धी करतो. अनेकांनी ही साइट अनलोड केल्याचे वृत्त आहे. चित्रपट पाहावा की पाहू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. चित्रपट पाहण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही. एखाद्या मुद्द्यावरून चित्रपटावर बहिष्कार घालण्याची भाषा करणाऱ्यांना एका चित्रपटावर किती लोकांची उपजीविका अवलंबून आहे आणि यामुळे त्यांच्या उपजीविकेवर किती विपरीत परिणाम होतो याची कल्पना नसेल.
शाहरूख खान व आमीर खानच्या वक्तव्यांबाबत वाद आहे. त्यांच्या वक्तव्याला तार्किक पद्धतीने प्रत्युत्तर दिले जावे. ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले त्याच पद्धतीने विरोधकांनीही आपले म्हणणे ठेवावे. किमान लोकशाही व सभ्य समाजाची आजवरची हीच रीत आहे. मात्र, ज्या पद्धतीने शिवीगाळ केली जात आहे, वैयक्तिक हल्ले सुरू आहेत आणि त्यांच्या आगामी चित्रपटांबाबत धमकीची भाषा वापरण्यात येत आहे त्याला कदापि योग्य म्हणता येणार नाही.
भावनेचे वादळ फार काळ टिकत नाही. शाहरूख आणि आमीरच्या वक्तव्यांवरून निर्माण झालेले हे वादळ काही दिवसांनी शमेल आणि त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाला कोणताही अडथळा येणार नाही, अशी आशा आहे. आमीर खानचा चित्रपट दंगल पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. मात्र, शाहरूख खानचा चित्रपट ‘दिलवाले’चे प्रदर्शन तोंडावर आलेले आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत अधिक चिंता आहे. तथापि, प्रचंड विरोधानंतरही अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे आमीर खानचाच पीके हा चित्रपट. प्रचंड विरोधानंतरही हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटगृहांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली.