मेलडीची मराठीतही क्रेझ
By Admin | Updated: February 24, 2016 03:20 IST2016-02-24T03:20:02+5:302016-02-24T03:20:02+5:30
पूर्वी मराठी गाणे हे ज्येष्ठ नागरिकच ऐकतात, अशी समजूत होती, परंतु कालांतराने यात खूप बदल झाला. कारण मराठी इंडस्ट्रीचा चढता आलेख पाहता चित्रपट जेवढे हिट होतात

मेलडीची मराठीतही क्रेझ
मैं तेनू सम जावां की
ना तेरे बिन लगदा जी...
आलिया भटच्या या गाण्याला तरुणाईने उचलून धरले आहे. तरुणांच्या मनाच्या कप्प्यापासून ते मोबाइलच्या रिंगटोनपर्यंत याच गाण्याची चर्चा मध्यंतरी दिसत होती, तसेच श्रद्धा कपूरने गायलेले ‘सुन रहा है ना तू,’ हे गाणे तर लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांच्या ओठी हे गुणगुण करू लागले होते. हळूहळू या मेलडी साँग्जचा प्रभाव मराठी इंडस्ट्रीतदेखील दिसू लागला. मेलडी या गाण्यांचे बॉलीवूडमध्ये जेवढे वजन आहे, तेवढेच वजन मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील आहे. पूर्वी मराठी गाणे हे ज्येष्ठ नागरिकच ऐकतात, अशी समजूत होती, परंतु कालांतराने यात खूप बदल झाला. कारण मराठी इंडस्ट्रीचा चढता आलेख पाहता चित्रपट जेवढे हिट होतात, तेवढीच गाणीदेखील प्रसिद्ध होत चालली आहेत. त्या पलीकडे जाऊनही काही मेलडी साँग्जमुळेच काही वेळा चित्रपट ओळखले जाऊ लागल्याचेदेखील दिसते, पण हा मेलडी शब्द सध्या लोप पावत चालला असला, तरी या शब्दाला बदलत्या लाइफ स्टाईलनुसार तरुणाईने ‘अनप्लग साँग’ हा नवीन शब्द जन्माला घातला आहे. खरं तर गाणी त्याच स्वरूपाची असतात, पण जनरेशननुसार गाण्यांना विशेष नावे दिली गेली आहेत. पूर्वी या गाण्यांना मेलडी साँग, तर नव्वदीमध्ये याच गाण्यांना तरुणाई ‘सॅड साँग’ म्हणून मिरवत होती आणि आता तर सध्याची तरुणाई थेट ‘अनप्लग साँग’ असा थेट शब्द वापरत आहे. ऐकायला हा शब्द जरा भारीच वाटतो. असो... चला तर, मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व तरुणांची मने जिंकणारी काही मराठी अनप्लग साँग पाहू यात. रवी जाधव दिग्दर्शित बालक-पालक या चित्रपटातील ‘का कळेना अशी हरवली पाखरे’ या मेलडी साँगला तर तरुणांनी थेट मोबाइलची रिंगटोनच बनविली. हे अनप्लग साँग शांत, एकांतातही मनाला आनंद देऊन जाते. त्यामुळेच कॉलेजियन्समध्ये अशा मेलडी गाण्यांची देवाण-घेवाणदेखील मोठ्या प्रमाणात होते, तसेच संजय जाधव दिग्दर्शित प्यारवाली लव्हस्टोरीमधील ‘जरा जरा दीवानापन, जरा मिठी चुभन’ हे अनप्लग साँगदेखील तेवढेच हिट झाले, तर नटरंगमधील ‘खेळ मांडला’ हे गाणे तर अजूनही चर्चेत असल्याचे दिसते. एखाद्या गाण्यातल्या धांगडधिंगापेक्षा काही मेलडी गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. बेस्ट पियानोवर वाजलेले किंवा त्या प्रेमळ गाण्यात वाजलेला हलकासा ड्रम या स्ट्रीगच मनाला अगदी भावणारी असते. तरुणाईदेखील हे गाणे जगतात, असे म्हणायला हरकत नाही.
अनप्लग साँगच आजच्या तरुणाईला पसंत पडत आहे. त्यामुळे हा एक ट्रेंडच चालू आहे, असे म्हणण्यास हरकत नाही, तसेच या गाण्यात रोमान्स व एक प्रकारची शांतता असते. त्यामुळेच तर ती तरुणांना भावते. ही मेलडी गाणी सध्या वेगवेगळ्या पॅटर्नमधून बाहेर येत असल्याचेदेखील दिसते.
- हर्षित अभिराज, संगीतकार
फॅशन, म्युझिक, सॉफ्ट रोमान्स यामध्ये थोडा बदल होऊन गाणी तयार होत आहेत. ती वेगवेगळया नावाने बाहेर पडत आहेत. या गाण्यात जास्त वाद्यवृंद नसल्यामुळे तरुणाईच्या ती पसंतीस पडत आहेत. त्यामुळे मेलडी इज बॅक असे म्हणण्यास हरकत नाही.
- दिनकर शिर्के, संगीतकार
संजय जाधव दिग्दर्शित ‘तू ही रे’ या चित्रपटात तेजस्विनी पंडित व सई ताम्हणकर या दोघींनी म्हटलेले ‘तोला तोला’ या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, तसेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीदेखील हे गाणे अधिक फायदेशीर असल्याचे दिसले.
सतीश राजवाडे दिग्दर्शित प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील अतुल कुलकर्णी व सागरिका घाटगे या जोडीचा रोमान्स दाखविणारे ओल्या सांजवेळी या गाण्याने तर तरुणांना वेड लावून ठेवले होते. या चित्रपटापेक्षा हे गाणेच सुपरहिट ठरले होते.