मराठी चित्रपटांचा मानदंड ‘बायोस्कोप’!

By Admin | Updated: July 13, 2015 02:36 IST2015-07-13T02:36:50+5:302015-07-13T02:36:50+5:30

मराठी सिनेमाचा आत्मा त्यातील आशय समजला जात असला तरी हल्ली दिग्दर्शक कोण हे बघूनही सिनेमाला गर्दी होण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे

Marathi films 'Bioscope'! | मराठी चित्रपटांचा मानदंड ‘बायोस्कोप’!

मराठी चित्रपटांचा मानदंड ‘बायोस्कोप’!

पुणे : मराठी सिनेमाचा आत्मा त्यातील आशय समजला जात असला तरी हल्ली दिग्दर्शक कोण हे बघूनही सिनेमाला गर्दी होण्याचा ‘ट्रेंड’ आला आहे. त्यामुळे जसे नटनट्यांच्या नावाने चित्रपट चालतात तसेच दिग्दर्शकाच्या नावानेही सिनेमे चालू लागले आहेत. परंतु सशक्त आशय, प्रसिद्ध नटनट्या आणि सर्जनशील दिग्दर्शक असे भक्कम ‘पॅकेज’ घेऊन ‘बायोस्कोप’ हा सिनेमा येत आहे. चार दिग्दर्शक, चार कवितांवरील वेगवेगळ्या चार गोष्टी, चार कवी, चार संगीतकार अशा चौकोनी भिंंगाच्या चौकटीतून सादर होणारा ‘बायोस्कोप’ दि. १७ जुलै रोजी संपूर्ण राज्यात प्रदर्शित होत आहे.
‘अथांश कम्युनिकेशन’, ’विजू माने प्रॉडशन्स’, ‘प्री. टु .पोस्ट फिल्म्स’ व ‘गोदा टॉकीज’ हे सहनिर्माते असून ‘गोल्डन ट्री एंटरटेंनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ व पी.एस.जे. एंटरटेन्मेंटने ‘बायोस्कोप’ची निर्मिती केली आहे. येत्या १७ जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
नटरंग, बालगंधर्व, बालक-पालक, टाईमपास यासारखे एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे व पाच वेळा राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक रवी जाधव तसेच ‘पिपाणी’, ‘टुरिंग टॉकीज’, ‘पोस्टकार्ड’, ‘अनवट’ यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, त्याचप्रमाणे ‘गुरुपौर्णिमा’, ‘भारतीय’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘बेदुणे चार’ अशा चित्रपटांद्वारे घराघरात पोचलेले दिग्दर्शक गिरीश मोहिते तर ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’, ‘ती रात्र’, ‘शर्यत’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने या चारही दिग्गजांनी एकत्र येऊन एकाच चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. परंतु असे जरी असले तरी प्रत्येकाच्या दिग्दर्शनाचे वेगळेपण आणि खासियत रसिकांना अतिशय ठळक आणि स्पष्टपणे जाणवणार आहे. कारण चार वेगवेगळ्या कवींच्या कविता निवडून त्यांच्या चार कथांचा ‘बायोस्कोप’ येथे साकारण्यात आला आहे.
यात मिर्झा गालिब यांची गझल ‘दिल-ए-नादान’ यावर गजेंद्र अहिरे यांनी, तर संदीप खरेच्या कवितेवर रवी जाधव यांनी ‘मित्रा’ हा लघुपट साकारला आहे. तसेच सौमित्र यांच्या कवितेवर ‘एक होता काऊ’ हा लघुपट विजू माने यांनी तर लोकनाथ यशवंत यांच्या कवितेवर गिरीश मोहिते यांनी ‘बैल’ नावाचा लघुपट बनविला आहे. कविता आणि त्यातून व्यक्त होणारी भावनिक कैफियत हा समान धागा धरून हे चौघे दिग्दर्शक या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
दिग्दर्शक विजू माने म्हणाले, की प्रत्येक कवितेत एक गोष्ट असते. ती साकारणे जसे आव्हानात्मक होते तसेच मनोरंजन करणारेही होते. आम्हा चौघांची आवड कविता असल्याने या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही कविता निवडताना चर्चा केल्या, संहिता एकमेकांना वाचून दाखविल्या.
एरवी असे कधीच होत नाही. हा खुलेपणा या सिनेमाच्या निमित्ताने अनुभवता आला. प्रत्येक दिग्दर्शक आपापल्या क्षेत्रात यशस्वी असल्याने प्रत्येकाच्या कामाची पद्धत जवळून पाहण्याचीही सुवर्णसंधी होती. एकंदरीतच हा प्रकल्प करताना खूप मजा आली आणि खूप शिकताही आले.
दिग्दर्शक अहिरे म्हणाले, की पहिल्यांदाच मराठीतील चार दिग्दर्शक एकत्र येऊन काम करीत असल्याने हा प्रयोग आमच्यासाठीही तेवढाच उत्सुकता वाढविणारा होता. हा संपूर्ण अनुभव सुखद होता.

Web Title: Marathi films 'Bioscope'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.