शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार! 'रणपति शिवराय' सिनेमाच्या टीमने उलगडला प्रवास
By सुजित शिर्के | Updated: February 3, 2026 15:06 IST2026-02-03T15:00:27+5:302026-02-03T15:06:16+5:30
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांच्या शौर्यकथा सांगणारे शिवराज अष्टकमधील सहावे पुष्ष 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' येत्या ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या आग्रा भेटीचा थरार! 'रणपति शिवराय' सिनेमाच्या टीमने उलगडला प्रवास
Ranpati Shivray Swari Agra Movie: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांच्या शौर्यकथा सांगणारे शिवराज अष्टकमधील सहावे पुष्ष 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' येत्या ६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून शिवरायांचा आग्रा भेटीचा थरार, औरंगजेबाला हुलकावणी देऊन त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करण्यासाठी वापरलेला गनिमी कावा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र आणि विराजस कुलकर्णी यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधला.
'रणपति शिवराय' सिनेमात प्रेक्षकांना वेगळे काय पाहायला मिळेल?
दिग्पाल लांजेकर : शिवराज अष्टकमधून छत्रपती शिवरायांचे विविध पैलू दाखवणाऱ्या कथा आपण सादर करतो. या सिनेमात शिवाजी महाराजांचे वेगळे रुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये धैर्य, धाडस, साहस, संयम आणि सरतेशेवटी राखेतून उभी राहण्याची वृत्ती जी छत्रपतींनी रुजवली हे पाहायला मिळेल. आग्य्राहून सुटका झाली तेव्हा महाराजांनी खूप मोठे धाडस केले होते. त्यामुळे हा सिनेमादेखील तसाच थरारक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दडपण आले होते का?
अभिजीत श्वेतचंद्र : मी खूप उत्साहित होतो पण, तेवढेच दडपण आणि जबाबदारी होती. मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे म्हणजे ही एका अभिनेत्यासाठी मोठी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर साकारताना शंभर काय दोनशे टक्के जरी दिले तरी ते कमी पडतील. कारण, त्यांचे कार्य खूप अफाट आहे. महाराजांना जर पडद्यावर दाखवायचे असेल तर ती खूप मोठी जबाबदारी आहे.
जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा कोणता पैलू सिनेमातून दिसणार आहे?
मृणाल कुलकर्णी : जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू प्रत्येक सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न दिग्पाल नेहमीच करतो. त्यामुळे मला त्याच भूमिकेतही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या छटा दाखवण्याची संधी मिळते. या सिनेमातून माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील आई आणि मुलाचे नाते दिसणार आहे. विरहाने व्याकूळ झालेली आई या सिनेमात दिसणार आहे.
औरंगजेबासारखा खलनायक साकारताना काय काळजी घ्यावी लागते?
समीर धर्माधिकारी : मी कोणतीही भूमिका साकारताना सर्वप्रथम त्या पात्राच्या भाषेचा विचार करतो. औरंगजेब साकारताना त्याची भाषा अचूक येणे हे मोठे आव्हान होते. मात्र कथा सुंदर लिहिलेली असल्यामुळे अडचण आली नाही. पण, मराठीपेक्षा हिंदीत काम करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. अशा भूमिका साकारताना भाषा, बॉडी लँग्वेज, लेखन आणि दिग्दर्शन हे सगळेच घटक तितकेच महत्त्वाचे असतात.
सिनेमातील तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील?
विराजस कुलकर्णी : सिनेमात मी हिरोजी फर्जंद यांची भूमिका साकारतो आहे. या आग्य्राच्या मोहिमेत त्यांच्या काय वाटा होता, हे सिनेमा पाहून कळेल. आग्रा भेटीचा थरार वाचनात आला होता. मात्र, प्रत्यक्षात शूटिंग करतानाही तो थरार जाणवला.