तेजश्री प्रधानने सांगितलं लग्नाचं 'परफेक्ट' वय; घटस्फोटावरही मांडलं परखड मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 16:10 IST2026-03-10T14:57:15+5:302026-03-10T16:10:25+5:30
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने तिशीच्या आधी लग्न करावं की नंतर? यावर भाष्य केलं. तसेच तिनं घटस्फोटावरही आपले परखड मत मांडले आहे.

तेजश्री प्रधानने सांगितलं लग्नाचं 'परफेक्ट' वय; घटस्फोटावरही मांडलं परखड मत
मराठी कलाविश्वात सध्या सनई चौघडे वाजत आहेत. मात्र कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या लग्नाचं वय उलटून गेलं तरी अद्याप सिंगल आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनत्री तेजश्री प्रधान. महाराष्ट्रात तेजश्री प्रधानचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तेजश्रीदेखील ३७ वर्षांची आहे. तिने शशांक केतकरसोबत लग्न करत संसार थाटला होता. मात्र एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आता ती सिंगल आहे. तेजश्री तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीने तिशीच्या आधी लग्न करावं की नंतर? यावर भाष्य केलं. तसेच तिनं घटस्फोटावरही आपले परखड मत मांडले आहे.
तेजश्रीने झी २४ तासला मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्नाच्या वयाबद्दल विचारले असता ती म्हणाली, "आजच्या काळात करिअरला प्राधान्य असल्यामुळे अनेकजण उशिरा लग्नाचा विचार करतात. पण मला वैयक्तिकरीत्या असं वाटतं की, लग्न तिशीच्या आधीच व्हायला हवं. म्हणून मी तेव्हा लग्न केलं होतं. ते जास्त काळ टिकू शकलं नाही, ही नंतरची गोष्ट आहे. त्याचं कारण म्हणजे, तिशीच्या आधी आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो, नवीन गोष्टी स्वीकारणं सोपं असतं. एकदा वय वाढलं की स्वतःला बदलणं कठीण होतं. माती ओली असेपर्यंतच तिला आकार देता येतो, तसंच काहीसं हे आहे".
घटस्फोटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन
वाढत्या घटस्फोटांच्या प्रमाणावर तेजश्रीने सकारात्मक मत मांडले. ती म्हणाली, "आताच्या काळात हे स्वीकारणं सोपं झालं आहे. मी ज्या काळात त्यातून गेले, तेव्हा थोडं कठीण असेल, पण उलट आजच्या काळात मला बरं वाटतंय की, आई-वडील त्यांच्या मुलींच्या, मुलांच्या बाजूने उभे राहतात. तुमचं कुटुंब तुमच्या बाजूने उभे असते, ही छान गोष्ट आहे. जग पुरोगामी होत आहे, प्रगती होत आहे ही चांगली गोष्ट आहे".
स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "माझ्या आयुष्यात जे चढ-उतार आले, त्या काळात माझे कुटुंब माझ्याबरोबर होते, हे मी अभिमानाने सांगू शकते. तुमचे कुटुंब तुमच्याबरोबर असेल, तर तुम्ही जगाशी लढू शकता. बाकी कोणाची गरज पडत नाही".
तेजश्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने स्वानंदी ही भूमिका साकारली आहे. तर या मालिकेत तिच्यासोबतीला समर या भूमिकेत सुबोध भावे आहे. यापूर्वी तिने 'होणार सून मी ह्या घरची' या लोकप्रिय मालिकेत 'जान्हवी'ची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मालिकांबरोबरच तेजश्रीने चित्रपटांतूनही आपला ठसा उमटवला आहे.