"खरं प्रेम मिळालं, तर जग इकडंच तिकडं करा... सोडू नका!" स्वप्नील जोशीचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:50 IST2025-06-04T15:50:14+5:302025-06-04T15:50:25+5:30
नातं टिकवण्यासाठी काय आवश्यक आहे? स्वप्नील जोशीनं सांगितली महत्त्वाची गोष्ट

"खरं प्रेम मिळालं, तर जग इकडंच तिकडं करा... सोडू नका!" स्वप्नील जोशीचा मोलाचा सल्ला
Swapnil Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याचा मोठा चाहता वर्ग आहे. बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या स्वप्नीलने आपल्या अभिनयातून अनेक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. अभिनयाबरोबरच तो अनेकदा वैयक्तिक आयुष्याविषयीही खुलेपणाने बोलतो. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने प्रेम, नाती या विषयांवर दिलखुलास संवाद साधला.
स्वप्नीलने 'दॅट ऑड इंजिनिअर' या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत प्रेमाविषयी बोलताना सांगितलं की, "जर तुम्हाला कुणीतरी मनापासून खूप आवडत असेल तर तिला मिळवण्यासाठी तुम्ही सर्व पणाला लावा. पण, खरं प्रेम पाहिजे. जर तुम्हाला खरचं वाटतं असेल की हे माझं आयुष्यभराचं प्रेम आहे, तरच. खरं प्रेम जर तुम्हाला मिळालं, तुम्ही तेवढे भाग्यवान असाल, तर जग इकडंच तिकडे करा, ते जाऊ देऊ नका. कारण, तुमचं आयुष्य बदलून जाईल".
एकतर्फी प्रेमाबद्दल स्वप्नील म्हणाला, "जसं एखाद्या मुलीचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं तिच्यावर नाही. पण, तुमच्या आयुष्यात दुसरी कुणी व्यक्तीही नसेल तर तो निर्णय आपण घ्यायला हवा. तुम्हाला वाटतं असेल ही मुलगी आपल्याला सुखी ठेवलं, नितांत प्रेम करेल, तर मग तिला न फसवता, तिच्याशी खरं बोललं पाहिजे. जर तुम्ही फक्त तिला तुम्ही आवडता म्हणून तिच्याशी लग्न केलं. तर मग तुम्ही दोन आयुष्य खराब करत आहात".
स्वप्नील म्हणाला की, "प्रेम सोपं नसतं. ते टिकवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जसं भात बनवण्यासाठी तीन शिट्ट्या द्यावा लागतात. वाफ निघू द्यावी लागते. तसंच नात्याचं असतं. नात्याला वेळ द्यावा लागतो. तेवढं ते नातं अधिक घट्ट बनतं. रिलेशनशिपमध्ये सुद्धा तसंच असतं. जेवढी मेहनत घ्या, जेवढे नात्याला वेळ द्याला तेवढं नातं दृढ बनतं". सध्या स्वप्नील जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
स्वप्नील जोशीने २००५ साली अपर्णा जोशी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर ४ वर्षांनी २००९मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. पहिल्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी स्वप्निलने पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. २०११ साली त्याने डेंटिस्ट असलेल्या लीना आराध्येसोबत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. आता त्यांना दोन मुलं आहेत.