अभिनेत्री सायली संजीवचा महिलांना मोलाचा सल्ला, महिला आयोगाबाबतही व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 16:05 IST2026-03-08T15:16:08+5:302026-03-08T16:05:39+5:30
सायली संजीवचा महिलांना खास सल्ला; पाहा अभिनेत्री नक्की काय म्हणाली?

अभिनेत्री सायली संजीवचा महिलांना मोलाचा सल्ला, महिला आयोगाबाबतही व्यक्त केली खंत
Sayali Sanjeev : जगभरातील लोक गेल्या शतकभरापासून ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) म्हणून साजरा करतात. लैंगिक विषमता आणि भेदभावाबद्दल जागरुकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे. जागतिक महिला दिन म्हटलं की, शुभेच्छांचा पाऊस पडतो. पण, खरोखरच स्त्रीच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडतोय का? यावरच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव हिने नुकतंच आपलं परखड मत मांडलं आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सायली म्हणाली, "मी महिलांबद्दल, मुलींबद्दल सतत बोलते आणि मी स्वत: एक मुलगी असल्याने कधी-कधी असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीवर बोललं पाहिजे. मुलींच्या बाबतीत आता काही ठिकाणी खूप सकारात्मक परिस्थिती पाहायला मिळते, जी कदाचित आमच्या बाबतीत आहे की आम्हाला छान-छान चित्रपट करायला मिळतात. आम्हाला वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात. या माध्यमातून विविध स्तरांवर आम्हाला पोहोचता येतं. वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो, भेटीगाठी होतात; यातून आम्ही आमचे करिअर तसेच आयुष्यातील काही टप्पे गाठत जातो. ही एक सकारात्मक गोष्ट झाली. खेळांच्या बाबतीत पी. व्ही. सिंधू, मेरी कोम अशा ज्या आपल्या महिला खेळाडू आहेत, त्या खूप ठिकाणी प्रगती करत आहेत".
समाजातील सद्यस्थितीवर बोलताना ती म्हणाली, "मला मान्य आहे की सगळे गुन्हे एकाच वेळी संपणे कदाचित शक्य नसेल, मात्र, त्यावर नक्कीच आळा घातला जाऊ शकतो. कुठेतरी या गोष्टींवर नियंत्रण पाहिजे. मला अजूनही वाटतं की आपला महिला आयोग अजूनही तितका मजबूत नाहीये, त्याच्यावर कोणी नियंत्रण ठेवणारे नाहीत".
सायलीने या मुलाखतीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे अन्याय सहन करणे. ती म्हणाली, "अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणं हे जास्त त्रास देणारे आहे, त्यामुळे अन्याय कधी सहन करू नये. सगळ्या महिलांना मी जागतिक महिलादिनी हीच विनंती करेन की तुम्हाला जे वाटतं, ज्याचा तुम्हाला त्रास होतो, ते तुम्ही उघडपणे बोला. बोलल्याने कदाचित प्रश्न मिटतील आणि सुटतीलसुद्धा. त्यानंतर जर तुम्हाला न बोलता एखाद्या गुन्ह्याला आणि एखाद्या वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागतंय तर कदाचित तुम्ही आधीच त्याविषयी बोललात तर तो प्रसंग तुमच्यासमोर येणार नाही". मुलाखतीच्या शेवटी सायली म्हणाली, "तुम्हाला संदेश देण्यासाठी मी एवढी मोठी नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की, तुम्ही स्वतःवर प्रेम करा".