"पाकिस्तानचं खूप झालं, आता बास" पुष्कर जोगचा संताप, पाक कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांना सुनावलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:17 IST2025-05-06T18:16:27+5:302025-05-06T18:17:02+5:30
पुष्कर जोगने पाकिस्तानवर संताप व्यक्त केला आहे.

"पाकिस्तानचं खूप झालं, आता बास" पुष्कर जोगचा संताप, पाक कलाकारांना पाठिंबा देणाऱ्यांना सुनावलं!
काश्मीरमधील पहलगाम इथं काही दिवसांपूर्वी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि दहशतवादावर कठोर कारवाईची मागणी सुरू झाली. दहशतवादाला खतपाणी देणाऱ्या पाकिस्तान विरोधात केंद्र सरकारनं अनेक निर्णय घेतले आहेत. भारतात पाकिस्तानी कलाकारांवरही आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. शिवाय अनेक कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील बॅन करण्यात आले आहेत. या प्रकरणी मराठी अभिनेता पुष्कर जोग याने प्रतिक्रिया दिली आहे.
पुष्कर जोगने 'लोकशाही फ्रेंडली'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या भावना मोकळ्या करत पाकिस्तानवर संताप व्यक्त केला. तसेच पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करु द्यावं, अशी भुमिका मांडणाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. तो म्हणाला, "काही लोक म्हणतात की राजकारण आणि मनोरंजन वेगळं आहे, त्यांचं लॉजिकच चुकीचं आहे. इथे येऊन पाकिस्तानी कलाकार कमावतात आणि पैसे तिकडे नेतात. आणि तोच देश दहशतवादाला मदत करतो. ही गोष्ट आपण डोळसपणे पाहिली पाहिजे. जे शहीद झाले, हा त्यांचा अपमान आहे", असं म्हणत त्याने स्पष्ट भूमिका घेतली.
पुढे तो म्हणाला, "आता पुरे झालं आहे. देश म्हणून आपण खूप सहन केलं. पाकिस्तानला आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानी लोकांच्या अंगात मस्ती, ती काढायला हवी. "२६/११ चा हल्ला, पुलवामा हल्ला, आता पहलगाम, असं किती दिवस सहन करणार?", असा थेट सवालही त्याने केला.
"मी काही पाकिस्तानी ओळखीच्या लोकांना अनफॉलो केलं"
पुढे पुष्कर म्हणतो, "माझ्या सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिक ओळखीचे होते, जे यूकेमध्ये राहतात. मी त्यांना अनफॉलो केलं आहे. कारण मी हे सगळं सहन करणार नाही. भारत माझा देशा माझ्यासाठी सर्वप्रथम येतो . पाकिस्तानी लोक हे पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी आम्ही लढण्यासाठी तयार आहोत, अस बोलत आहेत. जर त्यांच्या मनात काही खोट नाही तर त्यांनी दहशतवाद्यांना शोधण्यात मद केली पाहिजे. अत्यंत निर्लज्ज असे पाकिस्तानी लोक आहेत. त्याचा मला प्रचंड राग आहे".