"कित्येक दिवस बसून होतो, हातात काम नव्हतं...", अभिनेते दिपक शिर्केंनी सांगितला संघर्षमय प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:10 IST2025-06-05T12:54:24+5:302025-06-05T13:10:11+5:30
"कित्येक दिवस बसून होतो, काम नव्हतं...", दिपक शिर्केंनी सांगितला संघर्षकाळ

"कित्येक दिवस बसून होतो, हातात काम नव्हतं...", अभिनेते दिपक शिर्केंनी सांगितला संघर्षमय प्रवास
Deepak Shirke : बॉलिवूडच्या इतिहासात असे काही कलाकार आहेत ज्यांनी खलनायिकी भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. विशेष म्हणजे या कलाकारांच्या निगेटिव्ह भूमिकेलाही प्रेक्षकांनी उचलून धरलं. त्यातील एक नाव म्हणजे दिपक शिर्के (Deepak Shirke). अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं. 'थरथराट', 'दे दणादण', 'एक गाडी बाकी अनाडी', 'अग्निपथ', 'तिरंगा' यासारख्या चित्रपटातून प्रेक्षकांवर आपली छाप पाडली. वेगवेगळ्या मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये खलनायिकी भूमिका साकारुन दिपक शिर्के यांनी लोकप्रियता मिळवली. परंतु, या अभिनेत्याचा कलाविश्वातील प्रवास फार काही सोपा नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिपक शिर्के यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे.
नुकतीच अभिनेते दिपक शिर्के यांनी इट्स मज्जा ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाविषयी सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, "मी कितीतरी दिवस घरी बसून होतो. हातात काहीच काम नव्हतं. मग कुठेतरी छोट्या भूमिका करणं, असं करत होतो. त्या भूमिका केल्या कारण आपण कार्यरत आहोत, आपलं मन, बुद्धी शाबुत आहे, तर काम करायचं असा विचार करायचो. त्यामुळे मला एक उर्मी मिळाली. असं वाटलं की आपण करु शकतो. पैसा येतो, जातो पण.. सरस्वती असते कधीच आपल्याला सोडून जात नाही." अशा आठवणी दिपक शिर्के यांनी शेअर केल्या.
यानंतर पुढे संघर्षकाळातील आठवणी सांगताना ते म्हणाले, "माझ्या वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांचं निधन झालं. आमचं पितृछत्रच हरपलं. त्यानंतर घरगुती गृहोद्योग करुन पैसे जमा करुन जे काही पैसै उरायचे त्यामध्ये आम्ही दिवस काढले. आमच्यासोबत एक गडी देखील होता. तो सुद्धा आम्हाला कधी सोडून गेला नाही. तोही आमच्यासोबत राहायचा. असं करत ते दिवस गेले. त्यानंतर आम्ही थोडे नावारुपाला आलो. नाटकं केली मग 'एक शून्य शून्य' केलं. माझ्या सुदैवाने या पडत्या काळातमी कन्नड, पंजाबी,भोजपूरी अशा भाषांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. असा खुलासा त्यांनी या मुलाखतीमध्ये केला.
वर्कफ्रंट
१९९३ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'तिरंगा' या चित्रपटात दिपक शिर्के यांनी प्रलयनाथ गेंडास्वामी ही भूमिका साकारुन विशेष लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटामुळे कलाविश्वात त्यांची एक वेगळीच नवीन निर्माण झाली. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये खलनायिकी भूमिका साकारल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे अण्णा शेट्टी. 'अग्निपथ'मध्ये त्यांनी साकारलेली ही भूमिका चांगलीच गाजली.