अनुभवाच्या शाळेत शिकलो, घडलो : किशोर कदम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:55 IST2026-04-12T10:53:47+5:302026-04-12T10:55:17+5:30
Kishore Kadam News: अनुभवाच्या शाळेत शिकलो. त्यामुळे आज जो आहे आणि जसा आहे, ते या जगण्यातून आलेले संचित आहे, असे सांगत अभिनेते किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांनी आठवणी उजाळा दिला. कविताच्या माध्यमातून आपला जीवन प्रवासही त्यांनी यावेळी उलगडला.

अनुभवाच्या शाळेत शिकलो, घडलो : किशोर कदम
नवी मुंबई - अनुभवाच्या शाळेत शिकलो. त्यामुळे आज जो आहे आणि जसा आहे, ते या जगण्यातून आलेले संचित आहे, असे सांगत अभिनेते किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांनी आठवणी उजाळा दिला. कविताच्या माध्यमातून आपला जीवन प्रवासही त्यांनी यावेळी उलगडला.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित ‘जागर २०२६’ या व्याख्यानमालेतील पाचवे पुष्प गुंफताना पत्रकार अभिजित करंडे यांनी किशोर कदम यांच्याशी संवाद साधला.
लहानपणी अभ्यास करायला शिव मंदिरात जायचो. त्या परिसरात एकदा तानपुरा वाजविणाऱ्या माणसाने कविता लिहिशील का? असे विचारले. तोपर्यंत कविता लिहितात, हेदेखील माहिती नव्हते, अशी आठवण सांगत त्याने मला एक धून ऐकविली.
‘ज्ञान स्मारकाला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी’
नवी मुंबई महापालिकेने उभारलेल्या बाबासाहेबांच्या या ज्ञान स्मारकाला प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यायलाच हवी, असे सांगताना या ठिकाणचे ग्रंथालय, बाबासाहेबांचा जीवनपट दाखविणारे छायाचित्र संग्रहालय, ध्यान केंद्र, कार्यक्रमांचे सभागृह याठिकाणी एक सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी भावना अभिनेते कदम यांनी व्यक्त केली. याप्रसंगी समाज कल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती रंजना सोनवणे, ऐरोली प्रभाग समिती सभापती हेमांगी सोनवणे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, परिवहन सदस्य यशपाल ओव्हाळ, उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, किसनराव पलांडे, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, माजी नगरसेवक संजू वाडे व डॉ. गौतमी सोनवणे, माजी शिक्षण सदस्य अंकुश सोनावणे, लेट्स रीड फाउंडेशनचे प्रमुख प्रफुल्ल वानखेडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाची शाश्वत संकल्पना वेगवेगळी
आज प्रत्येक माणूस वेगवेगळ्या ज्ञानाच्या शोधात आहे, असे सांगत प्रत्येकाची शाश्वततेची संकल्पनाही वेगवेगळी असल्याचे मत कदम यांनी मांडले. आज आपण मुलांची नको इतकी काळजी घेतो. खारदांडा कोळीवाड्यात जन्म आणि लहानपण गेले असल्याने समुद्राशी एक वेगळे नाते असल्याचे सांगताना त्यांनी आपल्या कवितेतून सातत्याने डोकावणारा समुद्र, पाऊस आणि आई यांच्याशी असलेले नाते उलगडवून दाखविले. माझ्या पालकांनी जर माझ्याकडे इतके लक्ष दिले असते तर मी आज आहे तसा झालो नसतो, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.