अतिथी रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 15:11 IST2016-07-11T09:41:35+5:302016-07-11T15:11:35+5:30
गेला माधव कुणीकडे, दिनूच्या सासूबाई राधाबाई यांसारख्या नाटकातील आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले विनय येडेकर अतिथी देवो भवः या नाटकाद्वारे ...
.jpg)
अतिथी रसिकांच्या भेटीला
अतिथी देवो भवः या नाटकात तू कोणत्या भूमिकेत रसिकांच्या भेटीस येणार आहेस?
- अतिथी देवो भवः या नाटकातील माझी भूमिका खूपच वेगळी आहे. या नाटकात माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासोबतच एक संदेशही देणार आहे. अतिथी देवो भवः हे नाटक नर्मविनोदी आहे. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या मनाला भिडणार आहेत यात काही शंकाच नाही. एक पाहुणा अचानकपणे घरात येतो आणि त्यानंतर काय गंमत होते हे रसिकांना या नाटकात पाहायला मिळणार आहे. हे नाटक पाहाताना ही आपल्याच घरातील गोष्ट आहे असे आपल्याला वाटेल. त्यामुळे हे नाटक सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडणार आहे.
या नाटकाद्वारे तू अनेक वर्षांनंतर रंगभूमीवर पुन्हा परतत आहेस. दरम्यानच्या काळात नाटकात काम न करण्याचे काही कारण होते का?
- मला अनेक नाटकांच्या ऑफर्स येत होत्या. पण मला कोणत्याच नाटकाची संहिता आवडत नव्हती. त्यामुळे मी नाटकात काम करत नव्हतो. अतिथी देवो भवः हे नाटक पहिल्याच वाचनात मला प्रचंड आवडले. आणि त्यात विजय केंकरे या नाटकाचे दिग्दर्शन करत होते. त्यामुळे लगेचच मी या नाटकासाठी होकार दिला. नाटक, सिनेमा, मालिका हे तिन्ही माध्यम हे खऱ्या अर्थाने लेखकांचे माध्यम आहे. त्यामुळे कथा चांगली असल्याशिवाय काम करण्यात काहीच अर्थ नाही असे माझे मत आहे.
कभी इधर कभी उधर, आर.के.लक्ष्मण की दुनिया यांसारख्या खूप चांगल्या मालिकांमध्ये झळकल्यानंतरही तू मालिकांपासून दूर असतोस, असे का?
- मी सुरुवातीला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत असताना अभिनय करत होतो. त्यामुळे माझ्याकडे खूपच कमी वेळ असे. मी त्यावेळात खूपच चोखंदळपणे भूमिका निवडत असे. एखादी भूमिका खूपच चांगली वाटली तरच करायची असे मी ठरवले होते. त्यामुळे मी कभी इधर कभी उधर या मालिकेनंतर छोट्या पडद्यावर झळकलो नाही. मी अनेक वर्षांनंतर आर.के.लक्ष्मण की दुनिया या मालिकेत काम केले होते. त्यावेळी माझा संपूर्ण दिवस हा चित्रीकरणातच जात असे. मालिकांसाठी इतका वेळ देऊनही चांगले काम केल्याचे समाधान मला वाटायचे नाही. त्यामुळे मी मालिकांपासून दूरच राहाण्याचा विचार केला.
मालिका म्हणजे पाठांतराची परीक्षा - राजन भिसे
राजन भिसे यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवरील त्यांच्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. ते अतिथी देवो भवः या नाटकातही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटात, रंगभूमीवर साकारत असलेल्या भूमिकेचा प्रभाव अनेक वर्षं राहतो. नाटकातील, चित्रपटातील काही प्रसंग अनेक वर्षांनंतरही तुमच्या स्मरणात ताजे राहतात. पण मालिकांच्या बाबतीत तसे होत नाही. मालिकेत काम करत असताना दिवसभरात अनेक दृश्य चित्रीत करावी लागतात. या सगळ्यामुळे मालिका म्हणजे पाठांतराची परीक्षाच आहे असे मला वाटते असे राजन भिसे सांगतात.
![]()
गंभीर नाटकांना अधिक पसंती
छोट्या पडद्यावर सध्या अनेक विनोदी स्टँडअप कॉमेडीचे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. याचा परिणाम काहीसा रंगभूमीवर झालेला आहे असे आपल्याला पाहायला मिळत आहे. रसिक गंभीर नाटकांना भरभरून प्रतिसाद देत असले तरी ते विनोदी नाटकांकडे पाठ फिरवत आहेत असे अलीकडच्या नाटकाच्या कलेक्शनवरून दिसतेय. आमचे अतिथी देवो भवः हे नाटक कॉमेडी असले तरी एक अतिशय चांगला विषय यात हाताळला गेला आहे. त्यामुळे हे नाटक प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे.
![]()