'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 06:30 IST2018-09-11T17:01:51+5:302018-09-12T06:30:00+5:30
एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो.

'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन
लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' या आगामी सिनेमातील हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई - चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज जोशी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे.
फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शनच्या पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असून डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील भूमिका आहे. येत्या १२ ऑक्टोबरच्या मंगलमय प्रसंगी प्रदर्शित होत असलेल्या 'शुभ लग्न सावधान'ला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्याबरोबरच प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या फ्रेश जोडीची अदाकारी असलेल्या, 'शुभ लग्न सावधान' सिनेमातल्या नायकाला लग्नाची इतकी का भीती वाटतेय? हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रेक्षकांना लागली नसेल तर नवलच!