"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 20:34 IST2025-07-09T20:29:51+5:302025-07-09T20:34:43+5:30
janhvi kapoor shikhar pahatiya marathi language row : सध्या महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठी असा वाद पेटला आहे

"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
janhvi kapoor shikhar pahatiya marathi language row : सध्या सुरु असलेल्या मराठी आणि अमराठी या वादावर आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाने याने आपले मत व्यक्त केले आहे. ""आपली मराठी अस्मिता धमकावून नव्हे, तर सर्वांच्या समावेशातून चमकू द्या. मराठी हे हत्यार बनवू नका, त्यापेक्षा भाषेचा उत्सव साजरा करून त्याचे रक्षण करूया. अस्मिता ही स्वतःची ओळख उंचावणारी भावना असावी, कुणाच्यातही फूट पाडणारी नसावी. आपण भारतात कुठल्याही भागात राहत असलो किंवा आपण कोणतीही भाषा बोलत असलो तरी अस्मिता ही आपल्याला अभिमान देते, कोणताही पूर्वग्रह दुषित विचार देत नाही. मराठी अस्मिता खरी आहे. ती भावनिक स्तरावर आणि आपल्या जीवनशैलीत खोलवर रुजलेली आहे," असे शिखरचे मत आहे.
तो पुढे लिहितो, "सोलापूरमधील एक व्यक्ती म्हणून, मला ही बाब निश्चित समजते. प्रत्येक भाषा आपल्याला घडवते, राज्यांना आकार देते, आपल्याला कवितांपासून ते क्रांतीची प्रेरणा देते. मराठीही त्याला अपवाद नाही. आपण सर्व भाषांप्रमाणेच मराठीही जपली पाहिजे, संरक्षित केली पाहिजे आणि पुढे नेली पाहिजे. पण तो अभिमान इतरांच्या प्रतिष्ठेला धक्का लावून मिळवलेला असू शकत नाही. जे प्रामाणिकपणे कष्टाने जगत आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लावता कामा नये. सोलापूरचे बरेच लोक कठोर परिश्रम करण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी दिल्ली, चेन्नई किंवा कोलकाता येथे प्रवास करतात. कल्पना करा की जर त्यांना तेथे या भाषेसाठी अपमानित केले गेले तर तेव्हा आपण काय करायचे?"
"जेव्हा लोक संघर्ष करत असतात आणि कठोर परिश्रम करत असतात, त्यांच्या कुटुंबांपासून दूर असतात, तेव्हा हिंसक कृतीद्वारे अशा गोष्टी लादणे स्वीकारारण्यासारखे नाही. मुंबईत लोक हिंदी, तमिळ किंवा गुजराती बोलतात ही शोकांतिका नाही. खरी शोकांतिका म्हणजे मराठीला धोका आहे असे मानणे. भीती दाखवून आपण एखादी भाषा जिवंत ठेवू शकत नाही. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत हे त्या सर्वांचे आहे, जे सन्मानाने जगतात, प्रामाणिकपणे काम करतात आणि स्वाभिमानाने बोलतात, मग त्यांची भाषा कोणतीही असो," असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले. जान्हवी कपूरने देखील त्याची ही पोस्ट आपल्या स्टोरीवर शेअर करून त्याच्या विचारांना पाठिंबा दिला आहे.