‘हँडसम हीरो ही संकल्पना कालबाह्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2016 01:28 IST2016-07-16T01:28:42+5:302016-07-16T01:28:42+5:30
श्याम बेनेगल यांच्या सिनेमांवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे. एका वहिनीवर होणाऱ्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचे तीन सिनेमे दाखवले जाणार आहेत.

‘हँडसम हीरो ही संकल्पना कालबाह्य’
श्याम बेनेगल यांच्या सिनेमांवर प्रेक्षकांनी नेहमीच प्रेम केले आहे. एका वहिनीवर होणाऱ्या एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांचे तीन सिनेमे दाखवले जाणार आहेत. या निमित्ताने पॅरलल सिनेमा, आजचा सिनेमा यांविषयावर ख्यातनाम दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी आपली मते मांडली. आर्ट फिल्म, पॅरलल सिनेमा असा सिनेमांमध्ये जो भेदभाव केला जातो हे मला पटतच नाही असे श्याम बेनेगल सांगतात. सिनेमा हा केवळ चांगला अथवा वाईट असू शकतो, त्याशिवाय सिनमाचे प्रकार असूच शकत नाहीत. कोणताही सिनेमा हा त्याच्या कथेमुळे, त्यात असलेले कलाकार यांमुळे हिट होतो. सिनेमाची नाळ प्रेक्षकांशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली तर त्यांना सिनेमा आवडणारच याच काही शंका नाही. त्यामुळे सिनेमाचे वेगवेगळे प्रकार केले जाऊ नयेत असे स्पष्ट मत श्याम बेनेगल यांनी व्यक्त केले.
‘झी क्लासिकच्या इंडियाज फायनेस्ट फिल्मस’ या फिल्म फेस्टिव्हलमध्ये श्याम बेनेगल यांचे ‘सूरज का सातवा घोडा’, ‘मम्मो’, ‘गांधी से महात्मा तक’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गांधी से महात्मा तक या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी घडलेली एक घटना ते कधीच विसरू शकत नाहीत असे ते म्हणाले. या चित्रपटात महात्मा गांधी ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेत राहात होते, त्यावेळेचा काळ दाखवायचा होता. यासाठी अनेक भारतीयांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेत भारतीय खूप कमी असल्याने चित्रीकरणासाठी भारतीय कुठून आणायचे हा त्यांना प्रश्न पडलेला होता. त्यामुळे त्यांनी जाहिरात दिली. या जाहिरातीला उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या चित्रीकरणाला हव्या असलेल्या संख्येपेक्षा कित्येक पट अधिक लोक जमा झाले. तसेच या चित्रपटात रजित कपूर हा गांधीजीची भूमिका साकारणारा होता. या भूमिकेचा त्याच्यावर इतका प्रभाव पडला होता की तो शाकाहारी झाला. तसेच गांधीजीप्रमाणे स्वत:ची कामे ते स्वत: करायला लागला होता.
श्याम बेनेगल यांना आजच्या पिढीतील अनुराग कश्यप आणि दिबाकर बॅनर्जी यांचे चित्रपट खूप आवडतात. त्यांच्या मते, त्या दोघांचेही चित्रपट अतिशय चांगले असून ते मनाला भिडणारे आहेत. आजचे वातावरण खूप बदललेले आहे. आजच्या प्रगत मीडियामुळे त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. तसेच आजच्या पिढीला खूप चांगल्या संधी मिळत आहेत असे ते सांगतात. तांत्रिकदृष्ट्या आजचा सिनेमा प्रचंड प्रगतही झालेला आहे असेदेखील त्यांचे म्हणणे आहे.
आजच्या सिनेमातली बेनेगल यांनी आवडणारी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हिरो हा हँडसमच असला पाहिजे असा पूर्वी बॉलिवूडमध्ये असलेला समज बदलला आहे. हँडसम हिरो ही गोष्ट कालबाह्य झालेली आहे. पूर्वी हिरो हँडसम असल्याशिवाय, अथवा गोरा असल्याशिवाय त्याचा स्वीकार प्रेक्षक करत नसत. अभिनयक्षमता असली तरी अशा कलाकारांना दुय्यम भूमिका साकाराव्या लागत असत. पण आता ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आणि याचा मला प्रचंड आनंद होत आहे असेही ते म्हणाले. लोक दिसण्यापेक्षा अभिनयाला अधिक महत्त्व देऊ लागले आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आपल्या बॉलिवूडमध्ये घडत आहे. याचमुळे इरफान खान, नवाझुद्दीन सिद्दीकीसारख्या चांगल्या अभिनेत्यांना संधी मिळालेली आहे आणि या संधीचे त्यांनी सोनेदेखील केलेले आहे. आज इरफानने केवळ भारतातच नव्हे तर हॉलिवूडमध्येही आपले नाव कमावले आहे. आपला भारतीय सिनेमा खूपच बदलत असून नवनवीन गोष्टींचा स्वीकार करायला लागले आहे.
4हॉलिवूड, बॉलिवूड, टीव्ही अन् मराठी चित्रसृष्टीच्या रंजक बातम्या व गॉसिप वाचण्यासाठी लॉगइन करा ६६६.ूल्ल७्िरॅ्र३ं’.ूङ्मे