विखुरलेल्या कथेचा अनुभव!
By Admin | Updated: November 28, 2015 01:19 IST2015-11-28T01:19:54+5:302015-11-28T01:19:54+5:30
‘उर्फी’ या शब्दावरून काही अर्थबोध होणे तसे कठीणच, पण त्यामुळे हे शीर्षक घेऊन आलेला चित्रपट उत्सुकता वाढवण्याचे काम मात्र करतो; आणि मग त्यासाठी हा चित्रपट पाहणे ‘मस्ट’ ठरते

विखुरलेल्या कथेचा अनुभव!
सामान्यत: ‘उर्फी’ या शब्दावरून काही अर्थबोध होणे तसे कठीणच, पण त्यामुळे हे शीर्षक घेऊन आलेला चित्रपट उत्सुकता वाढवण्याचे काम मात्र करतो; आणि मग त्यासाठी हा चित्रपट पाहणे ‘मस्ट’ ठरते. पण या चित्रपटातून ‘उर्फी’चा शोध घ्यायला गेल्यास, चित्रपटाच्या उत्तरार्धापर्यंत वाट पाहणे गरजेचे ठरते. अर्थात यातून आवश्यक ती जिज्ञासा पूर्ण होत असली, तरी यातून नक्की हाती काय लागले, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो आणि दोन भागांत विखुरलेली कथा मात्र समोर येते.
‘उर्फी’ची कथा सुरुवातीपासूनच बरीचशी ओळखीची वाटायला लागते. कारण अशा प्रकारची गोष्ट आपण याआधी पाहिली आहे, याची थोड्याच वेळात खातरी पटत जाते. एका इस्टेट एजंटकडे काम करणारा देवा हा टपोरी तरुण, सोसायटीत नवीन घर घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरे दाखवण्याचे काम करतो. असंच एकदा आई-वडिलांसह घर पाहायला आलेल्या एका कुटुंबातली तरुणी अमृता हिला पाहताचक्षणी देवा तिच्या प्रेमात पडतो. हे कुटुंब तिथे वास्तव्यास आल्यावर तर देवा अमृतावर इम्रेशन मारण्याची एकही संधी सोडत नाही. देवा टपोरी असला, तरी त्याच्यातल्या माणुसकीची जाणीव काही प्रसंगांतून अमृताला पटते; आणि तीसुद्धा त्याच्या प्रेमाला साद देते. पण अशी सरळसोट चालणारी प्रेमकथा असेल, तर त्यात काय मजा? त्यामुळे यात पुढे बरीच वळणे येत जातात आणि त्यातून ‘उर्फी’ म्हणजे नक्की काय याचा उलगडाही होत जातो. चित्रपटाचे कथा व पटकथालेखक, तसेच दिग्दर्शक विक्रम प्रधान यांनी चित्रपटाच्या पूर्वार्धात प्रेमकहाणी मांडली आहे; आणि त्यातून निर्माण झालेल्या एका धाग्याभोवती उत्तरार्ध गुंफला आहे. हा प्रयत्न चांगला असला, तरी चित्रपटाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे सरळसरळ दोन भाग पडतात. मध्यांतरापूर्वी ‘हीरो’ असणाऱ्या नायकाची जागा नंतर दुसरीच व्यक्तिरेखा घेते. चित्रपटाला मिळालेली ही कलाटणी अनपेक्षित असली, तरी ती सहज न पटण्याजोगी ठरते. एखादा तरुण सुडाच्या उद्देशाने पुढे जे काही करतो, ते त्याला इतके सहज साध्य कसे होऊ शकते, हा प्रश्न तर नक्कीच पडतो. प्रेमात ताकद असते वगैरे ठीक आहे; परंतु एक टपोरी तरुण एकदम असंभवनीय अशी कामगिरी करतो, हे पटणे जरा जडच जाते. चित्रपटातले कुंभमेळ्याचे होणारे दर्शन ठीक आहे आणि कॅमेरावर्क जमून आले आहे.
यात देवा रंगवला आहे तो प्रथमेश सावंत याने आणि मागच्या पानावरून पुढे सुरू, अशा थाटात त्याचा ‘टाइमपास’ वावर यात आहे. अर्थात त्याची भूमिका तशीच लिहिली गेली असल्याने त्याचाही नाइलाज झाला असावा. उत्तरार्धात त्याच्या वाट्याला काही वेगळे प्रसंग आले आहेत आणि ते मात्र त्याने व्यवस्थित निभावून नेले आहेत. अमृताची भूमिका साकारणारी मिताली मयेकर हा फ्रेश चेहरा या चित्रपटाने दिला आहे आणि तिने ही भूमिका चांगली पेलली
आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात उपेंद्र लिमये याने पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रचंड भाव खाल्ला आहे. कविता लाड आणि मिलिंद फाटक या दोघांना फार काही करण्यास वाव नाही, पण त्यांचे अस्तित्व मात्र ते ठळकपणे दाखवून देतात. अभिजित केळकर, उदय सबनीस यांच्या भूमिका ठीक आहेत. एकूणच, चित्रपटाची कथा आणि पटकथेवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले असते, तर हा ‘उर्फी’ वेगळ्या धाटणीचा चित्रपट ठरला असता.