निवडणुकीमुळे वाढली ‘या’ कलाकारांची ‘डिमांड’
By Admin | Updated: February 19, 2017 08:24 IST2017-02-19T03:42:01+5:302017-02-19T08:24:17+5:30
सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. हे वारे अजूनही रंगतदार बनविण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पाहायला मिळतेय.

निवडणुकीमुळे वाढली ‘या’ कलाकारांची ‘डिमांड’
मुंबई, दि. 19 - सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. हे वारे अजूनही रंगतदार बनविण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे पाहायला मिळतेय. यामध्ये छोट्या पडद्यावरील कलाकारांना अधिक पसंती असल्याचे दिसत आहे. कारण, मालिकांच्या माध्यमातून हे कलाकार घराघरांत पोहोचतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या मालिकेच्या कलाकारांची क्रेझ निर्माण झालेली आहे. म्हणूनच आपल्या मतदाराला खूश करण्यासाठी उमेदवार कलाकारांची सर्वाधिक मागणी करीत असल्याचे पहायला मिळाले. त्याचबरोबर आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने यामध्ये कोणकोणत्या कलाकारांनी बाजी मारली आहे, याचा लोकमत सीएनएक्सने घेतलेला आढावा...
अमृता खानविलकर
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही देखील निवडणुकीच्या रिंगणात प्रेक्षकांच्या पसंतीमध्ये अग्रस्थानी आहे. याविषयी अमृता सांगते की,‘ दोन ते तीन महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांतून प्रचारासाठी विचारणा होत आहे. त्याचबरोबर, उमेदवारी घोषित झाल्यापासून जास्त प्रमाणात फोन खणखणत असल्याचे तिने यावेळी सांगितले.
हार्दिक जोशी
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील राणा म्हणजेच हार्दिक जोशी हा महाराष्ट्राच्या घराघरांत अधिक लोकप्रिय झाला आहे. प्रेक्षकांच्या या आवडत्या कलाकाराला सर्वाधिक मागणी असल्याचे समजते. या अभिनेत्याला प्रचाराच्या आमंत्रणासाठी दिवसाला १० ते १२ फोन येत असतात. मात्र, हा कलाकार कोणाच्याही वैयक्तिक कार्यक्रमात जाण्यापेक्षा सामाजिक कार्यात जाणे अधिक पसंत करतो आहे.
भाऊ कदम
आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता भाऊ कदम याला निवडणुकीच्या रिंगणात मोठी मागणी आहे. भाऊ सांगतो,‘मध्यंतरी पिंपरी आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले. या कार्यक्रमाला २० ते २५ हजार प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे या गर्दीचा फायदा नक्कीच उमेदवाराला होत असणार,’ असे मला वाटते.
सुरभी हांडे
प्रेक्षकांच्या ही लाडकी अभिनेत्री तर थेट निवडणुकीच्या प्रचारातच सहभागी झाली होती. एवढेच नाही तर तिने यादरम्यान जाहीर सभेत भाषण करुन प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याचबरोबर तिने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनदेखील केले आहे.
मृणाल दुसानीस
‘अस्सं सासरं सुरेख बाई’ या मालिकेतून मृणालने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. त्याचबरोबर, माझिया प्रियाला प्रीत मिळेना, तू तिथे मी या तिच्या मालिकादेखील प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. म्हणूनच या अभिनेत्रीला ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातदेखील जास्त प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात आमंत्रित केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.