पुन्हा जमणार हृतिक-फरहान-अभय देओलची गट्टी! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वल कन्फर्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:28 IST2026-02-10T11:28:28+5:302026-02-10T11:28:51+5:30
'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधली इमरान-कबीर-अर्जुन हे मैत्रीचं त्रिकुट प्रेक्षकांना आवडलं होतं. आता पुन्हा एकदा या तीन मैत्रीची गट्टी जमणार आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वलवर शिक्कामोर्तब झालं असून त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे.

पुन्हा जमणार हृतिक-फरहान-अभय देओलची गट्टी! 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वल कन्फर्म
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन सिनेमा आहे. तीन मित्रांच्या मैत्रीची अतूट गोष्ट सांगणारा हा सिनेमा आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'मधली इमरान-कबीर-अर्जुन हे मैत्रीचं त्रिकुट प्रेक्षकांना आवडलं होतं. या सिनेमात इमरानची भूमिका फरहान अख्तर, कबिरची भूमिका अभय देओल तर अर्जुनची भूमिका हृतिक रोशन याने साकारली होती. आता पुन्हा एकदा या तीन मैत्रीची गट्टी जमणार आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सीक्वलवर शिक्कामोर्तब झालं असून त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे.
२०११ मध्ये 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता तब्बल १५ वर्षांनी सिनेमाचा सीक्वल येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सीक्वलमध्ये पुन्हा इमरान-कबीर-अर्जुन दिसणार आहेत. या सीक्वलमधून या तीन मित्रांच्या आयुष्यात डोकावलं जाणार असल्याची माहिती आहे. इतक्या वर्षांनंतर आता त्यांचं आयुष्य, फ्रेंडशिप कशी बदलली, यावर सिनेमातून भाष्य केलं जाणार आहे. मिड डेने दिलेल्या रिपोर्टनुसार झोया अख्तर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात त्यांच्या भूतकाळातील इव्हेंट्स बद्दल भाष्य केलं जाणार नाही.
"झोयाने सिनेमाची कथा फायनल केली असून ती आनंदी आहे. तिचं नेहमी हेच म्हणणं होतं की 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' सिनेमाचा सीक्वल तेव्हाच होईल जेव्हा काहीतरी नवीन स्टोरी समोर असेल. भूतकाळातील गोष्टींवर हा सिनेमा बनवला जाणार नाही. तीन पुरुषांच्या आयुष्यात झालेला बदल या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे", अशी माहिती जवळच्या सूत्रांनी दिली आहे. फरहान अख्तर, हृतिक रोशन आणि अभय देओल यांच्याबरोबरच सिनेमात कतरिना कैफ, कल्की कोचिन, नसरुद्दीन शाह यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.