"कट कारस्थान करून माझं गर्भाशय काढलं, मला माहितच नव्हतं...", उदित नारायण यांच्यावर पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:26 IST2026-02-11T13:23:48+5:302026-02-11T13:26:54+5:30
उदित नारायण यांच्यासोबत त्यांचे दोन भाऊ आणि दुसऱ्या पत्नीवरही गंभीर आरोप केले आहेत. फसवणूक करून गर्भाशय काढल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी उदित नारायण यांच्यावर लावला आहे. अनेक वर्षांनंतर उपचारादरम्यान याबद्दल माहिती झाल्याचा खुलासाही रंजना यांनी केला आहे.

"कट कारस्थान करून माझं गर्भाशय काढलं, मला माहितच नव्हतं...", उदित नारायण यांच्यावर पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप
बॉलिवूडचे प्रसिद्ध सिंगर उदित नारायण चर्चेत आले आहेत. उदित नारायण यांची पहिली पत्नी रंजना नारायण झा यांनी सिंगरवर गंभीर आरोप केले आहेत. रंजना यांनी उदित नारायण यांच्याविरोधात सुपौल येथील महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उदित नारायण यांच्यासोबत त्यांचे दोन भाऊ आणि दुसऱ्या पत्नीवरही गंभीर आरोप केले आहेत. फसवणूक करून गर्भाशय काढल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी उदित नारायण यांच्यावर लावला आहे. अनेक वर्षांनंतर उपचारादरम्यान याबद्दल माहिती झाल्याचा खुलासाही रंजना यांनी केला आहे.
रंजना यांनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ डिसेंबर १९८४ रोजी त्यांनी उदित नारायण यांच्यासोबत हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. १९८५ च्या मध्ये उदित नारायण त्यांच्या करिअरसाठी मुंबईला गेले. त्यानंतर त्यांनी दीपा यांच्यासोबत लग्न केलं. मीडियामधून उदित नारायण यांनी दुसरं लग्न केल्याची माहिती रंजना यांना मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याबद्दल विचारलं असता अनेकदा दिशाभूल केल्याचा प्रयत्न केल्याचं रंजना यांनी सांगितलं.
रंजना यांनी उदित नारायण आणि त्यांचे दोन भाऊ संजय कुमार झा आणि ललिता नारायण झा यांच्यावर जबरदस्तीने गर्भाशय काढून टाकल्याचा आरोप केला आहे. उपचाराला घेऊन जातो असं सांगून दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये गर्भाशय काढलं, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी उदित यांची दुसरी पत्नी दीपा नारायणदेखील तिथे उपस्थित होत्या, असंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. आजारपण आणि आर्थिक चणचणीत आयुष्य काढणाऱ्या रंजना यांना उपचारादरम्यान गर्भाशय काढून टाकल्याची माहिती मिळाली, असं त्यांनी सांगितलं आहे.
२००६मध्ये रंजना उदित नारायण यांच्या मुंबईतील घरी आल्या होत्या. मात्र तिथे उदित नारायण आणि दीपा यांनी शिवीगाळ करून त्यांना घरातून हाकलून लावलं. त्यानंतर नेपाळमध्ये असलेल्या सासरी गेल्याचंही रंजना यांनी सांगितलं. मात्र तिथेही त्यांना हाकलून दिलं गेलं. तेव्हापासून माहेरीच राहत असल्याचं रंजना यांनी सांगितलं आहे.