पंगे कमी आहेत की, आता तुम्ही...; अजय देवगण-किच्चा सुदीपच्या वादात सोनू निगमची उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 15:26 IST2022-05-03T15:16:42+5:302022-05-03T15:26:03+5:30
Sonu Nigam on Ajay Devgn-Kiccha Sudeep Controversy: हिंदी भाषेवरचा वाद अद्याप शमलेला नाही. बॉलिवूड स्टार अजय देवगण आणि साऊथ स्टार किच्चा सुदीप यांच्यात यावरून चांगलीच जुंपली होती. आता या वादात बॉलिवूड सिंगर सोनू निगमनं उडी घेतली आहे.

पंगे कमी आहेत की, आता तुम्ही...; अजय देवगण-किच्चा सुदीपच्या वादात सोनू निगमची उडी
Ajay Devgn-Kiccha Sudeep Controversy: हिंदी भाषेवरचा वाद अद्याप शमलेला नाही. बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgn )आणि साऊथ स्टार किच्चा सुदीप (Kiccha Sudeep)यांच्यात यावरून चांगलीच जुंपली होती. आता या वादात बॉलिवूड सिंगर सोनू निगमनं (Sonu Nigam)उडी घेतली आहे.
अलिकडे अभिनेता अजय देवगणनं किच्चा सुदीपला ट्विटरवर चांगलंच सुनावलं होतं. ‘हिंदी राष्ट्रभाषा नाही तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीत डब का करता? हिंदी राष्ट्रभाषा आहे आणि कायम राहिल,’असं अजयने म्हटलं होतं. आता या वादावर सोनू निगमनं आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत सोनू यावर बोलला.‘ संविधानात कुठेही हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे असं लिहिलेलं नाही. देशात हिंदी भाषा सर्वाधिक राज्यांमध्ये बोलली जाते. पण ती राष्ट्रभाषा नाही. तमिळ ही सर्वात जुनी भाषा आहे. यावरूनही वाद आहे. पण लोकांच्या मते तमिळ ही सर्वात जुनी भाषा आहे. दुस-या देशांसोबत अनेक समस्या आहेत. नव्या समस्या तयार करण्याआधी त्या सोडवायला हव्या. बाकी देशांशी तुमचे पंगे कमी आहेत की, आता तुम्ही आपल्यात देशात नव्या समस्या निर्माण करत आहात?, असं सोनू म्हणाला.
‘कोणी कोणती भाषा बोलावी, हे सांगण्याचा अधिकार कुणालाही नाही. पंजाबी लोक पंजाबी बोलू शकतात. तामिळी तामिळ बोलू शकतात. तुम्हाला इंग्रजी येत असेल तर तुम्ही इंग्रजी बोलू शकतात. कोर्टाचं सगळं कामकाज इंग्रजीत होतं. मग हिंदी बोला, हे कसं काय? देशात आधीच इतकं काही सुरू आहे. तेव्हा देशात आणखी फूट पाडू नका,’असं सोनू म्हणाला.
काय आहे वाद?
साऊथ चित्रपटांनी सर्वत्र धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे यानिमित्ताने भाषेचा वाद उफाळून आला आहे. साऊथ अभिनेता किच्चा सुदीप बोलला आणि त्याचं वक्तव्य ऐकून बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण भडकला,असा सगळा हा मामला आहे. ‘हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही,’ असं वक्तव्य किच्चा सुदीपने केलं होतं. त्याच्या या वक्तव्यावर अजयने चांगलाच समाचार घेतला होता. . ‘हिंदी राष्ट्रभाषा नाही तर मग तुम्ही तुमच्या मातृभाषेतील सिनेमे हिंदीत डब का करता?’, असा खरपूस सवाल अजयने किच्चाला केला होता.