"दुसऱ्याचं लग्न नेहमीच चांगलं वाटतं, पण..." शाहिद कपूरनं सांगितलं सुखी संसाराचं रहस्य, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 15:20 IST2026-01-31T15:19:39+5:302026-01-31T15:20:56+5:30
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्यानं आपल्या २३ वर्षांच्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने भाष्य केले.

"दुसऱ्याचं लग्न नेहमीच चांगलं वाटतं, पण..." शाहिद कपूरनं सांगितलं सुखी संसाराचं रहस्य, म्हणाला...
बॉलिवूडचा 'कबीर सिंग' म्हणजेच अभिनेता शाहिद कपूर हा सर्वात हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक आहे. 'इश्क विश्क', 'जब वी मेट', 'हैदर', 'पद्मावत', 'कबीर सिंग', 'ब्लडी डॅडी', 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' आणि 'देवा' यांसारख्या चित्रपटांतून त्याने बॉलिवूडला दमदार चित्रपट दिले आहेत. आता तो पुन्हा एकदा दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यासोबत 'ओ रोमियो' या चित्रपटात दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शाहिदने आपल्या २३ वर्षांच्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने भाष्य केले.
'कमीने' आणि 'हैदर'सारख्या मास्टरपीस चित्रपटांनंतर शाहिद आणि विशाल भारद्वाज यांची जोडी 'ओ रोमियो'साठी एकत्र आली आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना शाहिद म्हणाला, "विशाल सरांसोबतचा हा माझा चौथा चित्रपट आहे. ही १९९० च्या दशकातील एका गुंडाची प्रेमकथा आहे. हे कथानक थोडं विचित्र, भयानक पण तितकंच रोमँटिक आणि भावनिक आहे".
पत्नी मीरा राजपूतसोबतच्या सुखी संसाराबद्दल शाहिदने मोलाचा सल्ला दिला आहे. शाहिद म्हणतो, "लग्न हे रोज करावं लागणारं काम आहे. स्वतःचे लग्न पाहून प्रत्येकाला वाटते की इतरांचे लग्न चांगले आहे, पण तसे नाही. आजकाल लोक इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर जितकं लक्ष देतात, तितकंच त्यांनी आपल्या नात्याकडे द्यायला हवं. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ आणि आदर देता, तेव्हाच नातं फुलतं. मीरा आणि मी जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न करतो".
इंडस्ट्रीमध्ये दोन दशकांहून अधिक काळ घालवल्यानंतर शाहिदचा यशाचा मंत्र अगदी साधा आहे. तो म्हणतो, "लोक काय विचार करतील याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला जे आवडतं ते करत राहा. स्वतःच्या आनंदासाठी आणि समाधानासाठी काम करणं सर्वात महत्त्वाचं आहे".