दिल्ली बॉम्बस्फोटावर शाहरुखची प्रतिक्रिया, जवानांच्या शौर्याचं कौतुक करत दहशतवाद्यांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 13:36 IST2025-11-23T13:36:15+5:302025-11-23T13:36:38+5:30
शाहरुख खाननं भारतीय सैनिकांच्या धाडसाचं आणि शौर्याचं कौतुक केलं.

दिल्ली बॉम्बस्फोटावर शाहरुखची प्रतिक्रिया, जवानांच्या शौर्याचं कौतुक करत दहशतवाद्यांना सुनावलं
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या कार स्फोटाच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. या दहशतवादी हल्ल्यांवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या, पण आता 'बॉलिवूडचा बादशाह' शाहरुख खान याने या हल्ल्यांवर प्रतिक्रिया दिली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या 'ग्लोबल पीस ऑनर्स २०२५' या कार्यक्रमात अभिनेत्याने शांतता, एकता आणि दहशतवादी हल्ल्यांवर भाष्य केले. तसेच भारतीय सैनिकांच्या धाडसाचं आणि शौर्याचं कौतुक केलं.
शाहरुख खानने या कार्यक्रमात बोलताना २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासह, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि अलिकडच्या दिल्ली बॉम्बस्फोटातील निष्पाप जीव गमावलेल्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली वाहिली. तसेच, कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या शूर सुरक्षा सैनिकांचे त्याने स्मरण केले. शाहरुख खान म्हणाला, "२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आणि अलिकडच्या दिल्ली बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांना माझी विनम्र श्रद्धांजली आणि या हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या शूर सैनिकांना माझा आदरपूर्वक सलाम".
यावेळी शाहरुखनं आपल्या जवानांसाठी खास चार सुंदर ओळी समर्पित केल्या, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. तो सैनिकांना उद्देशून म्हणाला, "जेव्हा कोणी तुम्हाला विचारेल की तुम्ही काय करता, तेव्हा अभिमानाने म्हणा, 'मी देशाचे रक्षण करतो'. "जर कोणी तुम्हाला विचारले की तुम्ही किती कमावता, तर थोडेसे हसून म्हणा, 'मी १.४ अब्ज लोकांचे आशीर्वाद कमावतो'. "जर तुम्हाला पुन्हा विचारलं गेलं की 'तुम्हाला कधी भीती वाटत नाही का?' तर त्यांच्या डोळ्यात डोळे टाकून उत्तर द्या की, 'जे आमच्यावर हल्ला करतात, त्यांना ती भीती जाणवते', या शब्दात त्यानं सैनिकांना सलाम ठोकत दहशतवाद्यांना भारताच्या शौर्याची आणि एकजुटीची ताकद दाखवून दिली.
शाहरुख खानने देशातील एकता आणि मानवतेच्या मूल्यावर भर दिला. त्याने उपस्थित लोकांसह संपूर्ण देशाला शांतता आणि सलोख्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. "आपण सर्वजण मिळून शांततेकडे पावले टाकूया. आपल्या सभोवतालचे जात, धर्म आणि भेदभाव विसरून मानवतेच्या मार्गावर चालत जाऊया जेणेकरून आपल्या देशाच्या शांततेसाठी आपल्या शूर सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही", असे तो म्हणाला. त्याने पुढे ठामपणे सांगितले की, "जर आपल्या भारतीयांमध्ये शांतता आणि एकता असेल, तर कोणीही भारताला हादरवू शकत नाही, हरवू शकत नाही आणि भारतीयांचा आत्मा तोडू शकत नाही".
#WATCH | Mumbai | At the Global Peace Honours 2025, Superstar Shah Rukh Khan says, "My humble tribute to the innocent people who lost their lives in the 26/11 terrorist attack, the Pahalgam terrorist attack, and the recent Delhi blasts and my respectful salute to our brave… pic.twitter.com/XQtJp0pm1I
— ANI (@ANI) November 22, 2025