"कोणी मला मारणार याची मला..." प्रियंका चोप्राने सांगितलं कडक सुरक्षेमागचं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:42 IST2026-02-12T13:41:52+5:302026-02-12T13:42:23+5:30
प्रियंकाने आता तिच्या कडक सुरक्षेमागचं खरं आणि महत्त्वाचं कारण उघड केलं आहे.

"कोणी मला मारणार याची मला..." प्रियंका चोप्राने सांगितलं कडक सुरक्षेमागचं खरं कारण
बॉलिवुड ते हॉलिवुड अशी झेप घेणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. उत्तर प्रदेशातील बरेली या छोट्या शहरातून आलेली प्रियंका आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. फक्त भारतातच नाही जगभरात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. जगातील सामर्थ्यशाली महिलांच्या यादीत तिचा समावेश होतो. प्रियंकाभोवती नेहमीच कडक सुरक्षा पाहायला मिळते. अनेकांना वाटतं की तिला काही धोका आहे, मात्र प्रियंकाने आता या सुरक्षेमागचं खरं आणि महत्त्वाचं कारण उघड केलं आहे.
८३ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सदरम्यान 'व्हरायटी'शी बोलताना प्रियंकाने स्पष्ट केले की, तिचे बॉडीगार्ड्स तिला कोणापासून वाचवण्यासाठी नसून, तिच्या संमतीशिवाय कोणी तिचे व्हिडीओ आणि फोटो काढू नये यासाठी असतात. प्रियंका म्हणाली, "मला चाहत्यांना भेटायला किंवा त्यांच्याशी गप्पा मारायला आवडतं. पण लोक जवळ येतात आणि परवानगी न घेता व्हिडीओ रेकॉर्ड करू लागतात, हे मला अजिबात आवडत नाही. माझ्या गार्ड्सनाही हे ठाऊक आहे".
प्रियंकासाठी कडक सुरक्षेचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिची मुलगी मालती मेरी ही आहे. प्रियांका म्हणाली, "आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. जेव्हा मी मुलीसोबत पार्कमध्ये असते किंवा आईस्क्रीम खात असते, तेव्हा अचानक आमचे खाजगी फोटो इंटरनेटवर व्हायरल होतात. हीच माझी सर्वात मोठी चिंता आहे. केवळ यासाठीच मला सुरक्षा लागते, अन्यथा मला कोणाची भीती नाही".
एस.एस. राजमौलींच्या 'वाराणसी'तून कमबॅक
प्रियंका चोप्रा सध्या एस.एस. राजमौली दिग्दर्शित 'वाराणसी' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे, तर पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे. हा चित्रपट प्रदर्शित व्हायला अजून एक वर्षाचा कालावधी असला, तरी जगभरात याची आतापासूनच मोठी उत्सुकता आहे.