"म्हातारे अफेयर लपवण्यात तरबेज..", ट्विंकल खन्नाचं वक्तव्य ऐकून काजोल झाली अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:28 IST2025-11-06T12:27:45+5:302025-11-06T12:28:21+5:30
Twinkle Khanna And Kajol : अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल सध्या त्यांचा 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' हा शो घेऊन चर्चेत आहेत. लेटेस्ट एपिसोडमध्ये नात्यांवर आणि अफेयर्सवर झालेल्या चर्चेने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

"म्हातारे अफेयर लपवण्यात तरबेज..", ट्विंकल खन्नाचं वक्तव्य ऐकून काजोल झाली अवाक्
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल सध्या त्यांचा 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' हा शो घेऊन चर्चेत आहेत. या शोच्या प्रत्येक नवीन एपिसोडमध्ये नव्या पाहुण्यासोबतची मजेशीर चर्चा आणि विनोदी प्रश्न-उत्तरं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये फराह खान आणि अनन्या पांडे त्यांच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आल्या होत्या. या शोमध्ये अनेकदा हसता-हसता सामाजिक विषयांवर भाष्य केलं जातं. लेटेस्ट एपिसोडमध्येही असंच काहीसं घडलं. यात नात्यांवर आणि अफेयर्सवर झालेल्या चर्चेने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.
प्राइम व्हिडीओवरील लोकप्रिय टॉक शो 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल'च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये ट्विंकल खन्नाने अफेयर्सबद्दल असं वक्तव्य केलं की, स्टुडिओमध्ये हशा आणि वादविवादाचं वादळ आलं. पाहुणी कलाकार फराह खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबतच्या 'अग्री-डिसअग्री' सेगमेंटमध्ये काही असे प्रश्न विचारले गेले, ज्यावर ट्विंकल खन्नाचं मत ऐकून तिची मैत्रीण काजोलही अवाक् झाली.
''वृद्ध लोक अफेअर लपवण्यात तरबेज''
'अग्री-डिसअग्री' सेगमेंटदरम्यान, ट्विंकल आणि काजोलने त्यांच्या पाहुण्यांना एक मनोरंजक प्रश्न विचारला. 'वयस्कर लोक त्यांचे अफेअर्स लपवण्यात तरुणांपेक्षा अधिक चांगले असतात का?' यावर ट्विंकल खन्नाने लगेचच सहमत असल्याचे दर्शवले. ती म्हणाली, "वयस्कर लोक यात जास्त चांगले असतात, कारण त्यांना खूप 'प्रॅक्टिस' असते." तिच्या या विधानाला फराह खान आणि अनन्या पांडे यांनीही पाठिंबा दिला.
ट्विंकलच्या बोलण्यावर काजोलची प्रतिक्रिया
मात्र, ट्विंकल खन्नाच्या मताशी तिची सह-होस्ट काजोल सहमत दिसली नाही. काजोलने आपलं मत मांडताना म्हटलं, "मला वाटतं की तरुण लोक त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट, अगदी अफेअरसुद्धा लपवण्यात जास्त हुशार असतात." यावर अनन्या पांडे म्हणाली की, सोशल मीडियामुळे आता सगळं काही उघड होतं. फराह खानने यावर तिचं मत व्यक्त करताना म्हणाली, "तरुण तर प्रेमात नसतानाही सर्व काही पोस्ट करतात."
''कपड्यांपेक्षाही वेगाने पार्टनर बदलतात तरुण''
यानंतर एका आणखी एका विधानावर चर्चा रंगली, ते म्हणजे 'आजची मुलं आपल्या कपड्यांपेक्षाही वेगाने आपले पार्टनर बदलतात.' यावर ट्विंकलने पुन्हा एकदा सहमती दर्शवली, तर बाकी तिघे असहमत दिसले. ट्विंकलने याला एक चांगली गोष्ट असल्याचे सांगत म्हटले, "आमच्या काळात असं होतं की, 'लोक काय म्हणतील? आम्ही हे करू शकत नाही'. पण ही (तरुण पिढी) त्यांचे पार्टनर पटापट बदलत आहेत आणि मला वाटतं की हे चांगलं आहे."
अनन्यानेही ट्विंकलला दिला पाठिंबा
अनन्या पांडेने आपलं मत मांडताना म्हटलं की, "ही गोष्ट केवळ आजच्या पिढीलाच लागू होत नाही, लोक नेहमीच पार्टनर बदलत आले आहेत, फक्त पूर्वी हे काम गुपचूप व्हायचं." यावर ट्विंकलने आणखी भर घालत म्हटलं, "आता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं ओझं नाहीये, ते फक्त विचार करतात... 'पटत नाहीये, तर पुढे चला.'"