14 व्या वर्षी हिरोईन अन् 18 वर्षी बनली आई, अशी आहे मौसमी चॅटर्जीची रिअल लाईफ स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2020 10:51 IST2020-04-26T10:49:23+5:302020-04-26T10:51:45+5:30

आज मौसमी यांचा वाढदिवस.

moushumi chatterjee birthday special marriage early made career successful in bollywood-ram | 14 व्या वर्षी हिरोईन अन् 18 वर्षी बनली आई, अशी आहे मौसमी चॅटर्जीची रिअल लाईफ स्टोरी

14 व्या वर्षी हिरोईन अन् 18 वर्षी बनली आई, अशी आहे मौसमी चॅटर्जीची रिअल लाईफ स्टोरी

ठळक मुद्देलग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपुष्टात येते, या मान्यतेला मौसमी यांनी छेद दिला.

कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक, फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात आपल्या अदाकारीने रिझवणा-या अभिनेत्री म्हणजे, मौसमी चॅटर्जी. आज (२६ एप्रिल) मौसमी यांचा वाढदिवस. २६ एप्रिल १९४८रोजी जन्मलेल्या या सदाबहार अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊ या काही रोचक गोष्टी...

मौसमी चॅटर्जी या नावाने सिनेसृष्टीत लोकप्रिय झालेल्या मौसमीचे खरे नाव फार कमी लोकांना ठाऊक असेल.

होय, मौसमी यांचे खरे नाव इंदिरा असे आहे. दिग्दर्शक तरूण मजूमदार यांनी त्यांचे मौसमी असे नामकरण केले.

 

मौसमी यांचे वडिल भारतीय लष्करात होते आणि आजोबा न्यायाधीश होते. तरूण मजूमदार हे ‘बालिका वधू’ या चित्रपटाची आॅफर घेऊन आलेत त्यावेळी मौसमी यांचे वय केवळ १४ वर्षे होते. त्यांचे वडिल मौसमींनी चित्रपटात काम करू नये, या मताचे होते. तरूण यांच्या पत्नीने मौसमींच्या घरच्यांची समजूत काढली आणि मौसमीने वयाच्या १४ व्या वर्षी तरुण मजुमदार यांच्या ‘बालिका वधू’ या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्यानंतर १९७२मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात एका दृष्टिहिन मुलीची भूमिका स्वीकारणे मौसमीसाठी आव्हान होते. पण मौसमी यांनी हे आव्हान स्वीकारले आणि पुढे या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

मौसमी ‘बालिका वधू’नंतर अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या. दोनच वर्षांत हिंदी चित्रपटांतही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. यशाच्या शिखरावर असताना मौसमी लग्नाचा निर्णय घेतील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण मौसमी यांनी लग्न केले आणि वयाच्या १८ व्या वर्षी पहिल्या अपत्याला जन्मही दिला. प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंतबरोबर मौसमी यांचे लग्न झाले.  

लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपुष्टात येते, या मान्यतेला मौसमी यांनी छेद दिला. लग्नानंतर काही वर्षांचा ब्रेक घेत, मौसमी यांनी चित्रपटांत पुन्हा एकदा धमाकेदार वापसी केली. आवाज, घायल, ना तुम जानो ना हम, आ अब लौट चले या चित्रपटांनी मौसमी यांना मोठे यश मिळवून दिले. मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले.
 

Web Title: moushumi chatterjee birthday special marriage early made career successful in bollywood-ram