करीना कपूर-खानने पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरला डावलून आदित्य धरचं कौतुक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:08 IST2026-04-09T11:45:54+5:302026-04-09T12:08:36+5:30
नुकतंच अभिनेत्री करीना कपूर हिने 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पाहिला असून, त्यावर प्रतिक्रिया दिली.

करीना कपूर-खानने पाहिला 'धुरंधर: द रिव्हेंज', रणवीरला डावलून आदित्य धरचं कौतुक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने सुरु केलेली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी अजूनही सुरुच आहे. प्रेक्षकांसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हा सिनेमा पाहिला आहे. रणवीरने साकारलेल्या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक केलं जात आहे. इतकंच नाही तर त्याच्या अभिनयाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहता आली. त्यामुळे अनेकांनी रणवीरला 'धुरंधर'चा खरा हिरो म्हटलं आहे. मात्र, अभिनेत्री करीना कपूर हिने चित्रपटातील खरा हिरो कोण रणबीर नाही तर आदित्य धर आहे, असं तिनं म्हटलंय. यावरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
नुकतंच अभिनेत्री करीना कपूर हिने 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पाहिला असून, त्यावर प्रतिक्रिया दिली. 'फायनान्शियल टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरने 'धुरंधर'च्या यशावर भाष्य केले. ती म्हणाली, "हा चित्रपट रणवीर सिंगचा नाही, तर तो पूर्णपणे दिग्दर्शक आदित्य धरचा चित्रपट आहे. आजही जेव्हा या चित्रपटाचा उल्लेख होतो, तेव्हा तो 'आदित्य धरचा धुरंधर' म्हणूनच ओळखला जातो". करीनाच्या मते, चित्रपटाच्या यशाचे संपूर्ण श्रेय हे दिग्दर्शकाला जाते.
करीनाचे हे विधान व्हायरल होताच सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी करीनावर पक्षपाताचा आरोप केला आहे. एका युजरने संतापून विचारले, "जर 'धुरंधर' आदित्य धरचा आहे, तर मग 'जब वी मेट' हा चित्रपट करीनाचा नसून इम्तियाज अली यांचाच म्हणायला हवा ना?". तर एका नेटकऱ्याने लिहिले, "असं असेल तर मग करीनाचा भाऊ रणबीर कपूरचा 'रामायण' हा चित्रपट केवळ नितेश तिवारी यांचाच असेल". करीनाने केवळ रणवीर सिंगच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करत हे विधान केल्याचा आरोप चाहत्यांनी केला. तिला रणवीरच्या यशाचा हेवा वाटत असल्याची टीकाही काहींनी केली आहे.
दरम्यान, यापुर्वी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनीदेखील रणवीरऐवजी दिग्दर्शक आदित्य धर हाच खरा सिनेमाचा हिरो आहे, असं म्हटलं होतं. "११० टक्के सांगते सिनेमाचा खरा हिरो दिग्दर्शक आहे. तो उत्तम दिग्दर्शक आहे. सुंदररित्या त्याने हा सिनेमा हाताळला. हा सिनेमा मोठा असूनही त्याने छान सादर केला'', असं तनुजा म्हणाल्या होत्या.