१४ सेकंदात बदललं आयुष्य! 'धुरंधर: द रिव्हेंज'मधील 'हा' अभिनेता पाकिस्तानात झाला लोकप्रिय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 09:44 IST2026-03-28T09:44:32+5:302026-03-28T09:44:51+5:30
१४ सेकंदांचा सीन करून पाकिस्तानात लोकप्रिय ठरला 'हा' अभिनेता

१४ सेकंदात बदललं आयुष्य! 'धुरंधर: द रिव्हेंज'मधील 'हा' अभिनेता पाकिस्तानात झाला लोकप्रिय!
दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) सध्या जगभरात बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'प्रमाणे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला सिनेमाचा पहिला भागदेखील प्रचंड गाजला होता. 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'नं केवळ मुख्य कलाकारांनाच नाही, तर छोट्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही रातोरात स्टार बनवले आहे. यातलं सर्वात गाजलेलं नाव म्हणजे विवेक सिन्हा. चित्रपटात 'जहूर मिस्त्री' ही नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या विवेकला सध्या सीमेपलीकडून म्हणजेच पाकिस्तानातूनही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज' या दोन्ही भागात विवेक झळकला. केवळ १४ सेकंदांच्या स्क्रीन स्पेसमध्ये विवेक सिन्हा प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवली. "हिंदू एक डरपोक कौम है", या त्याच्या प्रक्षोभक डायलॉगमुळे प्रेक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली. 'झी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत विवेक म्हणाला, "माझ्या इन्स्टाग्रामवर हजारो कमेंट्स आहेत. लोक म्हणतात की त्यांना मला मारावंसं वाटतंय. काही जण तर पाकिस्तानात येऊन मारण्याची धमकी देत आहेत. मला त्यांना सांगावं लागलं की बाबांनो, मी पाकिस्तानी नाही, मी भारतीयच आहे आणि बिजनौरचा राहणारा आहे!".
भारतातून धमक्या तर पाकिस्तानातून 'आय लव्ह यू'चे मेसेजे
भारतातून मिळणाऱ्या धमक्यांसोबतच विवेकला पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळत आहे. तिथल्या चाहत्यांनी त्याच्या अभिनयाचे कौतुक करत 'आय लव्ह यू सर' असे मेसेजेस पाठवले आहेत. आपल्या भूमिकेचा इतका प्रभाव पडेल, असे विवेकला कधीच वाटले नव्हते. 'धुरंधर २'च्या जागतिक यशामुळे तो सध्या भारावून गेला आहे.
संघर्षातून स्टारडमपर्यंत
आज विवेक जरी प्रसिद्धीच्या झोतात असला, तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अवघ्या सहा वर्षांचा असताना त्याने वडिलांना गमावले. आईने अत्यंत काबाडकष्ट करून त्याला वाढवलं. शिक्षणानंतर विवेक नोकरी करत होता, पण एका मित्राच्या सल्ल्याने त्याने अभिनयात नशीब आजमावण्याचे ठरवले. इंडस्ट्रीत छोट्या-मोठ्या भूमिका तो करत होता. पण, आता आदित्य धरच्या 'धुरंधर'ने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले आहे.