"नोटबंदी नंतरही पुलवामा हल्ला झाला...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर बॉलिवूड गायकाची जहरी टीका, म्हणाला- "सिनेमा फक्त..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:33 IST2026-03-23T11:33:16+5:302026-03-23T11:33:44+5:30
'धुरंधर २' पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूड सिंगर विशाल ददलानीने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नोटबंदीच्या सीनवरुन दिग्दर्शक आदित्य धरवर निशाणा साधला आहे.

"नोटबंदी नंतरही पुलवामा हल्ला झाला...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर बॉलिवूड गायकाची जहरी टीका, म्हणाला- "सिनेमा फक्त..."
Dhurandhar 2: 'धुरंधर २' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. प्रदर्शित होताच आदित्य धरच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. पण सोशल मीडियावर या सिनेमाला ट्रोलही केलं जात आहे. 'धुरंधर २' प्रपोगंडा सिनेमा असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. 'धुरंधर २' पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूड सिंगर विशाल ददलानीने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नोटबंदीच्या सीनवरुन दिग्दर्शक आदित्य धरवर निशाणा साधला आहे.
विशाल ददलानी 'धुरंधर २' सिनेमाचं नाव न घेता पोस्टमधून टीका केली आहे. "मनोरंजनासाठी सिनेमा बघा, पण माहिती ती योग्य सोर्सकडूनच मिळवा. सध्या जे काही सुरू आहे त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काहीही झालं तरी सत्य हे सत्य असतं", असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. या स्टोरीमध्ये त्याने नोटबंदीसंबंधी काही आर्टिकलही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की २०१६ मध्ये नोटबंदी झाल्यानंतरही देशात दहशतवादी हल्ले बंद झाले नाहीत. २०१९ मध्ये पुलवामामध्ये आतंकवादी हल्ला झाला होता आणि आताही बॉर्डरवर तणावपूर्व स्थिती आहे. नोटबंदीचा उद्देश टेरर फंडिंगवर नियंत्रण आणणं होतं मात्र त्यामुळे दहशतवादी हल्ल्यांवर काहीच परिणाम झाला नाही.

विशाल ददलानीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा उल्लेखही करण्यात आला आहे. RBIने दिलेल्या रिपोर्टनुसार, नोटबंदीनंतर फक्त ९९.३ टक्के नोटाच बँकेमध्ये परत आल्या. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १०००-५०० नोटांचे १५.४१ लाख कोटी रुपये वापरात होते. पण त्यापैकी फक्त १५.३१ लाख कोटीच्या नोटाच बँकमध्ये बदलल्या गेल्या. १०,७२० कोटी म्हणजेच ०.७ टक्के रक्कम ही बँकमध्ये परत आलीच नाही.
'धुरंधर २' सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. त्याने हमजा अली मदारी ही भूमिका साकारली आहे. तर संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. १९ मार्चला प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २'ने आत्तापर्यंत जगभरत ६९० कोटींची कमाई केली आहे.