"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 10:00 IST2025-04-26T09:59:34+5:302025-04-26T10:00:01+5:30
Mahesh Manjarekar on Chhaava Movie: मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत छावाच्या यशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'छावा' (Chhaava Movie) चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. ७० दिवसांपर्यंत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे आणि या चित्रपटाने अनेक सिनेमांचे विक्रम मोडीत काढले आहेत. आता तर अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ सिनेमालाही मागे टाकले आहे. दरम्यान आता मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी एका मुलाखतीत छावाच्या यशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महेश मांजरेकर यांनी मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत छावा सिनेमा आणि विकी कौशलबद्दलचं मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, विकी कौशल अप्रतिम कलाकार आहे. त्याचा सिनेमा चालला. छावाने जवळपास ८०० कोटींचा व्यवसाय केला. पण विकी कौशलने कधीच म्हणू नये की प्रेक्षक मला पाहायला आले. कारण मग लोक आधीचे पाच चित्रपटदेखील पाहायला आले असते. ते तू साकारलेले पात्र पाहायला आले. त्याचे या आधीचे पाच चित्रपट चालले नव्हते.
''महाराष्ट्राने हिंदी सिनेइंडस्ट्रीला वाचवलंय''
महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, माझ्या महाराष्ट्राने हिंदी सिनेइंडस्ट्रीला वाचवलंय, एवढं लक्षात ठेव. आज छावा जो चाललाय जोरात, त्याला ८० टक्के श्रेय महाराष्ट्राला जातं. ८० टक्क्यातील ९० टक्के पुण्याला जातं आणि मग बाकीचं महाराष्ट्राला जातं. त्यामुळे आज महाराष्ट्र इंडस्ट्रीला तारू शकतो. आता फार कोणतेच चित्रपट चालले नाहीत. एकेकाळी कलाकारांचे वर्चस्व असल्याचे मानले जायचे पण आता कळायला लागलंय की, फक्त कलाकारांवर सर्व काही अवलंबून असते.
वर्कफ्रंट
अभिनेते महेश मांजरेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच त्यांचा देवमाणूस हा सिनेमा रिलीज झाला आहे. यात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री रेणुका शहाणे आहे. तर या दोघांव्यतिरिक्त या सिनेमात सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी सिनेमा वधवर बेतलेला आहे.