फक्त पाणी पिऊन भागणार नाही! उन्हाळ्यात चक्कर, थकवा टाळण्यासाठी भाग्यश्रीने दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:22 IST2026-04-05T14:19:00+5:302026-04-05T14:22:55+5:30
भाग्यश्रीने उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली.

फक्त पाणी पिऊन भागणार नाही! उन्हाळ्यात चक्कर, थकवा टाळण्यासाठी भाग्यश्रीने दिला मोलाचा सल्ला
उन्हाळा सुरू झाला असून अनेक भागांतले तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे. अशात अनेकांना विविध त्रासांचा सामना करावा लागतोय. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि डिहायड्रेशनचा त्रास होणे सामान्य आहे. यातच अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) हिने उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. केवळ पाणी पिणे पुरेसे नसून, शरीराला एका विशिष्ट घटकाची अत्यंत गरज असते, असे तिने सांगितले आहे.
भाग्यश्रीनं व्हिडीओ शेअर केला आहे. भाग्यश्रीच्या मते, जेव्हा खूप जास्त उकडत असते किंवा घाम येत असतो, तेव्हा फक्त साधे पाणी पिऊन चालत नाही. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाईट्स (Electrolytes) म्हणजेच सोडियम, पोटॅशिअम आणि क्लोराईडची आवश्यकता असते.
भाग्यश्री म्हणाली, "फक्त पाणी पिऊन चालणार नाही. पाणी प्यायल्यानंतर शरीर हायड्रेटेड राहते. त्यामुळे पाणी पिणे गरजेचे आहे. पण, जेव्हा तुम्हाला खूप उकडत असेल किंवा खूप जास्त प्रमाणात घाम येत असेल, अशा वेळी फक्त पाणी पिऊन चालणार नाही. फक्त पाणी प्यायले तरी तुम्हाला शरीरात पाण्याची कमतरता जाणवेल. याचे कारण म्हणजे, तुमच्या शरीरातील इलोक्ट्रोलाईट म्हणजेच सोडियम, पोटॅशिअम, क्लोराईड कमी झाले आहेत. तुमच्या शरारीतील पेशींना पाणी शोषून घेण्यासाठी सोडियमची मदत होते. तसेच, क्लोराईड तुमच्या शरीरात पाणी योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी मदत करते. कारण, जर पेशींमध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाले, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते".
भाग्यश्रीने स्पष्ट केले की, घामावाटे शरीरातील आवश्यक क्षार बाहेर पडतात. अशा वेळी फक्त पाणी प्यायल्यास पेशींना ते शोषून घेता येत नाही. म्हणून व्यायामानंतर किंवा कडक उन्हात वावरल्यानंतर नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स पावडर मिसळून पिणे गरजेचे आहे. बाजारात इलेक्ट्रोलाईट्सची पाकिटे मिळतात, जी डॉक्टरांच्या सल्ल्याने सोबत ठेवावीत, असा सल्लाही तिने दिला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात होणारा थकवा आणि चक्कर टाळण्यासाठी भाग्यश्रीचा हा 'हेल्थ मंत्र' सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
.