'धुरंधर'मधल्या 'त्या' सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडले; आर माधवनने सांगितला प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:27 IST2026-02-21T15:26:07+5:302026-02-21T15:27:52+5:30
'धुरंधर'मध्ये पाकिस्तानात राहून हेरगिरी करणाऱ्या भारतीय गुप्तहेर हमजा अली मदारीची कथा दाखवण्यात आली. मात्र या सिनेमातील एका सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडल्याचा खुलासा आर माधवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

'धुरंधर'मधल्या 'त्या' सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडले; आर माधवनने सांगितला प्रसंग
काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' ओटीटीवर रिलीज झाल्यानंतरही थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. अजूनही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. 'धुरंधर'मधील सीन्स आजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'धुरंधर'मध्ये पाकिस्तानात राहून हेरगिरी करणाऱ्या भारतीय गुप्तहेर हमजा अली मदारीची कथा दाखवण्यात आली. मात्र या सिनेमातील एका सीननंतर अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल ढसाढसा रडल्याचा खुलासा आर माधवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
'धुरंधर'मध्ये रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन अशी तगडी स्टारकास्ट आहे. अक्षय खन्नाने या सिनेमात रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. तर अर्जुन रामपाल मेजर इक्बालच्या भूमिकेत आहे. भारतात होणाऱ्या दहशतवादी कारवायांमागे रहमान डकैत आणि इक्बालचा असल्याचं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. 'धुरंधर'मध्ये मुंबईत झालेल्या भयानक २६/११ या दहशतवादी हल्ल्याचा कटही दाखवण्यात आला आहे. या सीनमध्ये रहमान डकैत आणि इक्बालच्या भूमिकेत असलेले अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल आहेत. मात्र हा सीन झाल्यानंतर त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. या सीननंतर सेटवरच वातावरणही बदललं होतं, असं माधवन सोनिया शिनॉयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
आर माधवनने सांगितलं की "जसं सीनचं शूटिंग पूर्ण झालं ते दोघेही रडले. असं वाटत होतं की दोघेही आतून पूर्णपणे तुटले आहेत. तो त्यांच्यासाठी फक्त अभिनय नव्हता. तर तो क्षण ते खरंच जगले होते. त्यांनी खऱ्या आयुष्यात ती घटना अनुभवली आहे. त्यामुळे हा सीन करताना त्यांना पुन्हा सगळं ते आठवलं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की हा सिनेमा किती खास असणार आहे". 'धुरंधर'नंतर आता 'धुरंधर २' १९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.