आमिर खानने नाकारला उज्वल निकम यांचा बायोपिक, लागली या अभिनेत्याची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:02 IST2025-06-19T16:01:40+5:302025-06-19T16:02:53+5:30
Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे आमिर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे.

आमिर खानने नाकारला उज्वल निकम यांचा बायोपिक, लागली या अभिनेत्याची वर्णी
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' (Sitare Zameen Par) या चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे आमिर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. आमिर खानचे नाव अशा निवडक कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे जे पटकथा आणि पात्र आवडल्यासच चित्रपट करण्यास तयार असतात. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनणाऱ्या वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या बायोपिकची भूमिका आमिरला ऑफर करण्यात आली होती, परंतु त्याने ती नाकारली. आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. आमिरने हा सिनेमा नाकारल्यानंतर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे.
मॅडॉकचा आगामी बायोपिक सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित आहे, ज्यामध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर निकम यांची वकील म्हणून भूमिका दाखवली जाईल. या चित्रपटात उज्ज्वल निकम यांच्या जीवनाची कहाणी दाखवली जाणार नाही. अखेर या बहुप्रतिक्षित बायोपिकसाठी अभिनेत्याचा शोध पूर्ण झाला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्ट्सनुसार, राजकुमार राव या चित्रपटात उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारणार आहे. निर्मात्यांनी त्याची या भूमिकेसाठी निवड केली आहे. आमिर खानने या प्रोजेक्टमधून माघार घेतल्यावर, मॅडॉक फिल्म्सने चित्रपटातील वकिलाच्या भूमिकेसाठी राजकुमार रावची मुख्य अभिनेता म्हणून निवड केली. मात्र, निर्मात्यांनी अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
असा असेल उज्ज्वल निकम यांच्यावरील बायोपिक
हा चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित आहे, परंतु तो बायोपिकच्या स्वरूपापेक्षा खूप वेगळा असेल. हा चित्रपट भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या कायदेशीर लढाईवर केंद्रित असेल. २६/११ च्या हल्ल्यानंतर न्याय मिळवण्याची कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रिया दाखवणे हा त्यांचा उद्देश आहे. निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाचे शीर्षक निश्चित केलेले नाही. दिग्दर्शक अविनाश अरुण धावरे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. प्राइम व्हिडिओच्या हिट मालिका 'पाताल लोक'च्या दोन्ही सीझनमध्ये त्यांनी दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय, अविनाश 'किल्ला' आणि 'थ्री ऑफ अस' सारख्या लोकप्रिय चित्रपटांसाठी देखील ओळखला जातो. सुमित रॉय यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.