"मी दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही..." पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:16 IST2025-06-16T11:14:38+5:302025-06-16T11:16:23+5:30
पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, मौन बाळगण्याचं कारण सांगितलं

"मी दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही..." पहलगाम हल्ल्याबाबत आमिर खानचं मोठं विधान, म्हणाला...
Aamir Khan on Muslims Terrorists: जम्मू काश्मिरच्या पहलगाम खोऱ्यात २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात सुमारे २६ लोक मारले गेले होते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारल्याचं काहींनी पीडितांनी सांगितलं होतं. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. या घटनेवर काही बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, काहींनी मौन बाळगलं होतं. त्यापैकी एक म्हणजे आमिर खान. अभिनेत्यानं पहलगामबद्दल थेट काही बोलला ना ऑपरेशन सिंदूरबद्दल वक्तव्य केलं होतं. आता त्याने याबद्दल त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आमिर खान हा नुकतंच 'आप की अदालत' शोमध्ये पोहचला होता. यावेळी त्यानं पहलगाम दहशतवादी हल्ला क्रूर आणि भ्याड असल्याचं वर्णन केलं. अभिनेता म्हणाला, "दहशतवादी हल्ला क्रूर होता. यावरून दहशतवाद्यांची भ्याडपणा दिसून येतो. त्यांनी आपल्या देशात घुसून सामान्य लोकांवर गोळीबार केला. तुम्ही किंवा मीही तिथे असू शकलो असतो. त्यांनी धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला. याचा अर्थ काय?" असा प्रश्न केला.
पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच अभिनेत्यानं का प्रतिक्रिया दिली नाही, या प्रश्नावर तो उत्तर देत म्हणाला, "मी सोशल मीडियावर नाही. त्यामुळे काही घडलं की लोक अवघ्या काही सेकंदांमध्ये त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहितात. परंतु मी त्यावर बोललो होतो. जेव्हा मी एका कार्यक्रमात गेलो होतो, तिथे मला विचारण्यात आलं असता मी माझी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिली होती. हा केवळ आपल्या देशावरच नाही तर आपल्या एकतेवरही हल्ला होता. त्यांना आपल्या देशाकडून आधीच योग्य उत्तर मिळाले आहे". आमिर खान पुढे म्हणाला की, त्याने या दहशतवादी हल्ल्यामुळे 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द केला होता. त्याने 'अंदाज अपना अपना'चा प्रीमियर देखील रद्द केला होता.
पुढे आमिर म्हणाला, "कोणताही धर्म तुम्हाला लोकांना मारण्यास सांगत नाही. मी या दहशतवाद्यांना मुस्लिम मानत नाही, कारण इस्लाममध्ये लिहिले आहे की तुम्ही कोणत्याही निष्पाप व्यक्तीला मारू शकत नाही, तुम्ही कोणत्याही महिलेवर किंवा मुलावर हल्ला करू शकत नाही. ते जे करत आहेत, ते धर्माच्या विरोधात जात आहेत". आमिर खानने असेही म्हटले की, "दहशतवादी हल्ल्याचा त्याच्यावर खोलवर परिणाम झाला. तो इतका दुःखी होता की तो अनेक दिवस घराबाहेरही पडला नाही".